राज्यात तब्बल 5 लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत; अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जात असली तरी अजूनही राज्यातील ५ लाख १६ हजारांहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर असल्याचे समोर येत आहे.
राज्यातील १४ लाख 20 हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर २५ मे पर्यंत राज्यातील ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता. त्यामुळे ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.
शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील १२ लाख ४९ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १० लाख ८ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरला आहे. तर ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरलेले विद्यार्थीच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या कॅप राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे लाखो विद्यार्थी यंदाही अकरावी प्रवेश प्रक्रियेपासून लांब राहणार असल्याचे दिसून येत आहे.
८१ हजार विद्यार्थ्यांकडून अर्जप्रक्रिया नाही
पुणे विभागातून अकरावी प्रवेशासाठी दुसरा भाग भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६८ हजार १३४ एवढी आहे. तर पुणे विभागातून इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ७५३ एवढी आहे. त्यामुळे एकट्या पुणे विभागातील ८१ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरला नसल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक फेऱ्या घ्याव्या लागणार
मुंबई विभागातून इयत्ता दहावीमध्ये ३ लाख ७ हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर मुंबई विभागातून अकरावी प्रवेशासाठी केवळ २ लाख १६ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. त्यामुळे मुंबई विभागातील ९० हजार ४९५ विद्यार्थी अजूनही अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाला मागील वर्षे अकरावी प्रवेशासाठी अनेक फेऱ्या घ्याव्या लागल्या होत्या. यंदाही अनेक फेऱ्या घ्याव्या लागतील, असे चित्र दिसून येत आहे.






