फोटो सौजन्य- सोेशल मीडिया
Study in India Program: भारतातील उच्च शिक्षण आता केवळ देशातील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही. जगातील अनेक देशांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी सातत्याने भारतात येत आहेत. नुकताच शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या ‘ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन’ (AISHE) २०२३-२४ च्या अहवालात परदेशी विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.
अहवालानुसार, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ दरम्यान भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये १७३ देशांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी नेपाळमधून आले आहेत. तर राज्यांचा विचार केला, तर परदेशी विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक हे सर्वात पसंतीचे राज्य ठरले आहे. चला तर मग जाणून घेऊया परदेशी विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरलेली टॉप राज्ये कोणती आहेत.
‘ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन’ (AISHE) २०२३-२४ नुसार, शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये एकूण ५८,१३४ परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हा सर्वे देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून ऑनलाईन माध्यमातून माहिती गोळा करून तयार केला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिक्षक, कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि परीक्षांचे निकाल यांसारख्या अनेक माहितीचा समावेश असतो. हाच अहवाल उच्च शिक्षणाशी संबंधित धोरणे तयार करण्यासाठी आणि त्यांच्या देखरेखीसाठी आधार मानला जातो.
अहवालानुसार, भारतात शिकण्यासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वात मोठा वाटा नेपाळचा आहे. एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी २४.१ टक्के विद्यार्थी एकट्या नेपाळमधून आले आहेत. यानंतर संयुक्त अरब अमिराती ७ टक्के, अमेरिका ५.९ टक्के, बांगलादेश ५.९ टक्के, नायजेरिया ५.५ टक्के आणि झिम्बाब्वे ४ टक्के हिश्श्यासह समाविष्ट आहेत. अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, परदेशी विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येत पहिल्या १० देशांचा वाटा ६३.८ टक्के राहिला.
कर्नाटक हे परदेशी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे शिक्षण केंद्र म्हणून समोर आले आहे. येथील उच्च शिक्षण संस्थांमध्ये ७,९१४ परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या यादीत पंजाब दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे ७,९०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय महाराष्ट्रात ६,१९०, उत्तर प्रदेशात ५,९५३ आणि तामिळनाडूमध्ये ५,६९४ परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ही पाच राज्ये परदेशी विद्यार्थ्यांना सर्वाधिक आकर्षित करणारी राज्ये ठरली आहेत.
नेपाळ, युएई, अमेरिका, बांगलादेश, नायजेरिया आणि झिम्बाब्वे व्यतिरिक्त लेबनॉन, बुर्किना फासो, मंगोलिया, मेक्सिको, कझाकिस्तान, बेलारूस आणि चिली यांसारख्या अनेक देशांतील विद्यार्थ्यांनीही वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण मंत्रालयाने परदेशी विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने वर्ष २०१८ मध्ये ‘स्टडी इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केला होता. जगातील वेगवेगळ्या देशांतील विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी आकर्षित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अहवालानुसार, भारतात येणाऱ्या बहुतांश परदेशी विद्यार्थ्यांनी अंडरग्रेजुएट (UG) म्हणजेच पदवी अभ्यासक्रमांना पसंती दिली आहे. भारतात शिकत असलेल्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी ७३.६ टक्के म्हणजेच ४२,७७९ विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत आहेत. यामध्ये २७,८४९ मुले आणि १४,९३० मुलींचा समावेश आहे. तर ९,८४५ विद्यार्थ्यांनी पोस्टग्रेजुएट म्हणजेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला आहे. याशिवाय काही विद्यार्थी डिप्लोमा, पीएचडी, सर्टिफिकेट आणि इंटिग्रेटेड कोर्सेसमध्येही शिक्षण घेत आहेत.
एआयएसएचई (AISHE) अहवालानुसार, भारतातील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढली आहे. वर्ष २०१९-२० मध्ये जिथे ४८,८९८ परदेशी विद्यार्थी होते, तिथे २०२३-२४ मध्ये ही संख्या वाढून ५८,१३४ झाली आहे. अहवालानुसार, या कालावधीत मुले आणि मुली अशा दोन्ही श्रेणींमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. परदेशी मुलांची संख्या ३२,३८६ वरून वाढून ३७,२९५ झाली आहे, तर परदेशी मुलींची संख्या वाढून २०,८३९ वर पोहोचली आहे.






