फोटो सौजन्य - Social Media
“ध्येय मोठं असेल आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असेल, तर कोणतीही परिस्थिती आड येत नाही,” हे शिरपूर जैन येथील अंजली संतोष वाढे हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या अंजलीने जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात करत देशातील प्रतिष्ठित Indian Institute of Technology Bombay मधून बीटेक पदवी संपादन केली आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अंजलीचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. शिरपूर जैन येथील जिल्हा परिषद शाळेतून तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच तिची बुद्धिमत्ता आणि अभ्यासातील आवड स्पष्ट दिसून येत होती. तिच्या गुणवत्तेच्या जोरावर इयत्ता सहावीमध्ये तिची निवड जवाहर नवोदय विद्यालयासाठी झाली. पुढे इयत्ता नववीमध्ये असताना ‘मायग्रेशन’ अंतर्गत तिला राजस्थान येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आले.
घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही अंजलीच्या आई-वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी अथक संघर्ष केला. वडील संतोष वाढे हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, तर आई शिवणकाम करून मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लावत होती. शेती नसलेल्या या कुटुंबासाठी शिक्षणाचा खर्च भागवणे मोठे आव्हान होते. मात्र अंजलीनेही परिस्थितीची जाणीव ठेवून संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले.
अंजलीच्या यशामध्ये ‘दक्षिणा फाउंडेशन’चाही मोठा वाटा राहिला. इयत्ता अकरावीमध्ये तिची या फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. या माध्यमातून तिला JEE परीक्षेसाठी दर्जेदार मार्गदर्शन आणि शैक्षणिक मदत मिळाली. त्याचा फायदा घेत तिने JEE परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आणि अखेर आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश मिळवला.
आज अंजलीने बीटेक पदवी पूर्ण करून केवळ आपल्या कुटुंबाचंच नव्हे, तर संपूर्ण गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. जि.प. शाळेतून सुरू झालेला तिचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.






