फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE Three Language Policy: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधान मोदी (Digvijaya Singh letter to PM Modi) यांना पत्र लिहून चालू शैक्षणिक सत्राच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईच्या(CBSE) त्रि-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारने या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
ते यामध्ये लिहतात की, पुरेशा प्रमाणात शिक्षक, पाठ्यपुस्तके किंवा पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ न देता धोरणांची अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. सीबीएसईच्या ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (OSM) प्रणालीच्या घाईघाईने केलेल्या अंमलबजावणीने ज्याप्रकारे गोंधळ उडाला होता, तशीच परिस्थिती यामध्येही निर्माण होऊ शकते. असा इशाराही त्यांनी दिला. तसेच त्यांनी या पत्रात नमूद केले की, सीबीएसईच्या चालू शैक्षणिक सत्राच्या मध्यभागी त्रि-भाषा धोरणाच्या सक्तीच्या अंमलबजावणीला विरोध करणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निवेदन मी या पत्रासोबत जोडत आहे.
पुढे सिंग यांनी म्हटले आहे की, सीबीएसईच्या गव्हर्निंग बॉडीने डिसेंबर २०२५ मधील बैठकीत अभ्यासक्रम समितीच्या शिफारसीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार ‘एनसीईआरटीने (NCERT) श्रेणीबद्ध भाषा पाठ्यपुस्तके प्रसिद्ध करेपर्यंत शाळांनी भाषांच्या संदर्भात सध्याचीच अ्भ्यासपद्धती सुरू ठेवावी, असे ठरवले आहे. मात्र, सीबीएसईने स्वत:च्याच निर्णयांचे उल्लंघन केल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांनी त्रिभाषिक धोरण अनेक गैरहिंदी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरेल, असेही स्पष्ट केले आहे.
काही दिवसापूर्वी दिग्विजय सिंग यांनी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नीट पेपर’फुटीच्या मुद्द्यावरही पत्र लिहून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) गेल्या आठ वर्षात आयोजित केलेल्या परीक्षांमधील पेपरफुटी किंवा गैरव्यवहारांची संपूर्ण माहिती देणारी श्वेतपत्रिका जारी करावी, अशीही मागणी केली होती. तसेच लाखो विद्यार्थी प्रचंड मानसिक दबावाखाली असताना परीक्षा व्यवस्थेवरील त्यांचा विश्वास दृढ करणे गरजेचे असल्याचे पत्रात सांगितले होते.






