फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Sunil Lohar NEET Success Story Rajasthan Sikar 2026: नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या नीट यूजी री-एग्जामचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये नीट परीक्षा देऊन यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा समोर येत आहेत. अशीच एक यशाची कहाणी राजस्थानमध्ये राहणाऱ्या सुनील लोहार या तरुणाची आहे, ज्याने आपल्या अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाला गमावल्याच्या दुःखाने त्याला काही काळासाठी थांबवले होते. त्यावेळी त्याची हिम्मत तुटली होती, तो आतून खचला होता; पण या सर्व परिस्थितींशी लढा देऊन त्याने स्वतःला पुन्हा नीट परीक्षेसाठी तयार केले. आपल्या विखुरलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्याने स्वतःशीच संघर्ष केला आणि आज त्याने नीट परीक्षा पास केली आहे. चला तर मग, सुनील लोहारची ही प्रेरणादायी यशोगाथा जाणून घेऊया.
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील रींगस या छोट्या शहरात राहणारा सुनील लोहार एका अतिशय गरीब कुटुंबातील आहे. लहान वयातच त्याच्या खांद्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्या होत्या आणि आयुष्यातील संघर्षातून मार्ग काढत त्याने यशाची पायरी गाठली. ज्या समाजात त्याचा जन्म झाला, तिथे भंगार गोळा करण्याचे काम केले जायचे. त्यामुळे तो स्वतः घरोघरी जाऊन भंगार गोळा करायचा.
लहानपणापासूनच त्याने वडिलांना भंगार आणि लोखंड गोळा करून आणताना पाहिले होते. भंगाराचा व्यवसाय त्यांच्या कुटुंबात सुरुवातीपासूनच केला जात होता. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर सुनीलही वडिलांसोबत कामावर जायचा. परंतु, लहानपणापासूनच त्याने डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाच्या आड कुटुंबाची गरिबी आणि बिकट आर्थिक परिस्थिती येत होती. १२ वीचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याला वडिलांसोबत भंगार गोळा करण्याचे काम करावे लागले. वडिलांनी त्याचा अभ्यास थांबवला होता, परंतु त्याने जिद्दीने आणि संघर्षाने पुन्हा पुस्तके हातात घेतली.
कशीबशी १२ वीची अभ्यास पूर्ण करून जेव्हा सुनीलने नीट परीक्षेची तयारी सुरू केली आणि परीक्षेचे दिवस जवळ आले, तेव्हा त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या ६ महिन्यांच्या बाळाचा एका आजारपणामुळे मृत्यू झाला. या अथांग दुःखातून स्वतःला सावरून त्याने डॉक्टर बनण्याच्या आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि नीट यूजी परीक्षा दिली.
आपल्या बाळाला गमावल्याचे दुःख व्यक्त करण्यासाठी सुनील फक्त एका दिवसासाठी घरी गेला होता, परंतु लगेचच तो परत अभ्यासाला निघून गेला आणि त्याने मोबाईल फोनपासूनही पूर्ण अंतर ठेवले. कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याने नीट परीक्षा देण्याचा ठाम निर्णय घेतला. २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या नीट यूजी परीक्षेत तो सहभागी झाला होता. या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून ऑल इंडिया रँक ५६८० मिळवून त्याने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्याची ही यशोगाथा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरू शकते.






