फोटो सौजन्य - Social Media
अंधत्वमुक्त महाराष्ट्र घडवणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन, वनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार झाला. या उपक्रमांतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांतील १,८०० शाळांमधील तब्बल ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. त्यामुळे शासनाने जगातील अग्रगण्य चष्मा उत्पादन करणाऱ्या एसीलर लक्सोटिका कंपनीसोबत भागीदारी केली. या भागीदारीनुसार महाराष्ट्रातील २५ लाख शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून, दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४२,७६२ विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे चष्मे वाटण्यात आले आहेत.
या उपक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांनाही नेत्र तपासणीची सुविधा मिळत आहे. ‘दृष्टी यज्ञ युनिव्हर्सल स्कूल आय हेल्थ प्रोग्राम’ या नावाने सुरू झालेल्या या मोहिमेतून धूसर दृष्टीमुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण अडथळ्याशिवाय पुढे जावे, हे सुनिश्चित केले जात आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सांगली, बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, सोलापूर, अकोला, धुळे, जालना, बुलढाणा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश झाला आहे. मोबाईल तपासणी युनिट्स, प्रशिक्षित नेत्रतज्ञांची पथके आणि जागतिक दर्जाच्या लेन्स यांच्या साहाय्याने या मोहिमेने शालेय जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.
पूर्वी फळा नीट न दिसल्यामुळे अभ्यासात अडथळा येणारे विद्यार्थी आता स्पष्ट दृष्टीमुळे ताण न घेता वाचन करू शकतात, वर्गात लक्षपूर्वक शिकतात आणि आत्मविश्वासाने सहभाग घेतात. हा उपक्रम केवळ नेत्र आरोग्यापुरता मर्यादित नसून तो महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. शिक्षण आणि प्रगतीच्या मार्गावर दृष्टीदोष हा अडसर ठरू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे. “स्वच्छ दृष्टी हीच उज्ज्वल भविष्यातील गुरुकिल्ली आहे. या उपक्रमातून आपण हजारो मुलांचे जीवन बदलत आहोत. चांगले शिक्षण, उच्च ध्येये आणि उज्ज्वल भवितव्य याचे दरवाजे आपण त्यांच्यासाठी उघडतो आहोत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.