फोटो सौजन्य - Social Media
राज्यात उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षेला सुरुवात होत असून, यंदा ‘कॉपीमुक्त अभियान’ अधिक कडकपणे राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, २० फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही परीक्षा बुधवार, १८ मार्चपर्यंत चालणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ८ लाख ६५ हजार ७४० मुले, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून, ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे.
परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. राज्यभरात २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत आहेत. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अनेक केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे परीक्षा प्रक्रिया कैमेराबद्ध केली जाणार आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, १९८२ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असून, हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास आधी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० आणि दुपारी २.३० वाजता पेपर सुरू होणार आहेत. प्रवेशपत्र शाळांच्या लॉगिनमधून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. गतवर्षीप्रमाणेच विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर १० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार आवश्यक सवलती लागू राहतील. प्रशासनाने सर्व व्यवस्था पूर्ण केल्याचा दावा करत विद्यार्थ्यांना शांत आणि प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे.






