संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वैमनस्यातून सराइतांनी तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडीत घडली आहे. याप्रकरणी सराइतांसह साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय हरिसिंग परदेशी (वय ४४), जय अनिल परदेशी (वय २१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सादिक महंमद शेख (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), नूर नजीर शेख, इरफान शेख (दोघे रा. नाडेगल्ली, गणेश पेठ), सलीम कासीम तांबोळी, इम्रान उर्फ इम्मू सत्तार शेख (दोघे रा. कोंढवा) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत सोनू उर्फ माँटी अनिल परदेशी (वय २७, रा. म्हसोबा मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार परदेशी ओळखीचे आहेत. यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. बुधवारी मध्यरात्री आरोपींनी सोनू परदेशी याचे काका अजय आणि लहान भाऊ जय यांना कासेवाडी भागात अडवले. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी काका आणि लहान भावाला सोडविण्यासाठी गेलेला सोनू याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक आकाश थिटे तपास करत आहेत.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे सुद्धा वाचा : चोरांना राहिला नाही धाक! घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली अन्…
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.