संग्रहित फोटो
शिर्डी : जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत साई मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ काकडी विक्रेत्या महिलेची चाकूने सपासप वार करुन निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे साईभक्तांत भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने दोन महिला आरोपींना अटक केली आहे. जयश्री क्षीरसागर असे मृत महिलेचे नाव असून, या प्रसंगाने शिर्डीतील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील गुंडगिरीचा आगडोंब उसळला होता. या गुंडगिरीच्या निषेधार्थ चार दिवस श्रीरामपूर शहर बंद होते. त्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी शिर्डी येथील गुन्हेगारी, दहशतीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांनी कठोर धोरण अवलंबल्यानंतर कारवाया झाल्या. त्यानंतर शिर्डीतील गुन्हेगारीची चर्चा काहीशी शमली असतानाच आता पुन्हा महिलेचा खून झाल्याची आणि हा खून देखील महिलांनीच केल्याचे समोर आल्याने पोलिस प्रशासनासह सर्वच आवाक आहेत.
शिर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१९ जुलै) रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय २९, रा. बाजारतळ, शिर्डी) या साई मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ काकडी आणि कैरी विक्रीसाठी थांबल्या होत्या. आरोपी फिजा उर्फ नोझिया लुकमान पटेल (रा. कालिकानगर) आणि अंजली राजू खंडिखोड (रा. द्वारकानगर) या दोघी तेथे आल्या. त्यांनी जयश्री यांना काकडी विकण्यास विरोध केला. त्यावरून झालेल्या वादाने हिंसक रूप घेतले. जयश्री यांच्यावर सपासप वार केल्याने त्यांना तातडीने साईबाबा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत महिलेचे पती साईनाथ भालचंद्र क्षीरसागर (वय ३०) यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश चव्हाण करत आहेत.
तपासाची सूत्रे वेगाने फिरवली
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती आणि पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वेगाने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही महिला आरोपींना अटक केली आहे. जयश्री यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पार्थीव नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे सुद्धा वाचा : पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
… आणि परिसरात उडाला एकच थरकाप
रविवार असल्याने मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. मंदिरात साईबाबांच्या शेजआरतीची तयारी सुरू होती. याच दरम्यान झालेल्या वादातून दोन्ही महिला आरोपींनी धारदार शस्त्राने जयश्री यांच्या पोटावर आणि मांडीवर सपासप वार केले. जयश्री यांचा आरडाओरडा आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेने परिसरात थरकाप उडाला.






