संग्रहित फोटो
पुणे : सातारा रस्त्यावर भरधाव पीएमपीने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातूबाग परिसरात हा अपघात घडला असून, महिला विवाह सोहळ्यावरून घरी निघाली होती. अपघातात महिलेबरोबर असलेली नात गंभीर जखमी झाली आहे. आशाबाई दत्तात्रय साळुंके (वय ५७, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता) असे मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. अपघातात साळुंके यांची नात प्रचिती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीएमपी चालक सतीश राजाराम गोरे (वय २७, रा. कोंढणपूर, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल दत्तात्रय साळुंके (वय ३८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, साळुंके कुटुंबीय नातेवाईकांच्या विवाहासाठी शनिवारी रात्री पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात गेले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास तक्रारदार साळुंके यांची आई आशाबाई, मुलगी प्रचिती घरी निघाले. नातूबाग परिसरातून ते रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने रस्ता ओलांडणाऱ्या आशाबाई साळुंके आणि त्यांची नात प्रचिती यांना धडक दिली. अपघातात आशाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख तपास करत आहेत.
अपघाताचे प्रमाण वाढले
पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सोलापूर-पुणे रस्त्यावर भल्या पहाटे वाहन तपासणीसाठी नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुणासह त्याची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, मोटारचालक चेतन सिंग, दुचाकीवरील सहप्रवासी सायली टिंगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
हे सुद्धा वाचा : सदाशिव पेठेत भरदुपारी फ्लॅट फोडला; अमेरिकन डॉलर चोरले
टेम्पोने तिघांना उडविले
गेल्या काही दिवसाखाली सातारा-पुणे महामार्गावरील मांगडेवाडी गावाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला महिला पतीसह मैत्रिणीशी गप्पा मारत उभा असताना भरधाव पॅगो टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर दाम्पत्य जखमी झाले आहेत. दिपाली वैभव बर्गे (वय ४५) अशी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, आदीनाथ वायदंडे (वय ५९) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पार्वती वायदंडे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. ९ नोव्हेंबर रोजी पावणे आठच्या सुमारास हा अपघात घडला आहे.