दुहेरी हत्याकांडाने हादरले नागपूर
नागपूर : सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाजार परिसरात बुधवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरली. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यावसन दोन तरुणांच्या निर्घृण हत्येत झाले. या घटनेत आदित्य ऊर्फ सोनू गजानन भोंडवे (वय २७, सोमवारी क्वार्टर) आणि आदित्य राऊळकर (वय२५, बजरंगनगर) यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषी नरेश पुट्टेवार, वैभव ऊर्फ दादू प्रदीपराव डोंगरे, वेदांत डबीर आणि अभी राऊत यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे. ऋषी पुट्टेवार हा गोंड मोहल्ला परिसरात फळांचा घाऊक व्यवसाय करतो. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खुणे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. उपायुक्त रश्मिता राव यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
न्यायवैद्यक पथकाने तपासणी केल्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासात मृत आदित्य भोंडवे याच्यावर हल्ला, घरफोडी व दरोड्याचे काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.
दोन्ही गट दुपारी पोलिसांच्याच ताब्यात
मृत आदित्य भोंडवे व आरोपी वैभव डोंगरे हे पूर्वीचे मित्र असून, त्यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. बुधवारी दुपारी दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली होती. हे प्रकरण सक्करदरा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गटांना काही काळ ताब्यात घेतले होते. मात्र, रात्री त्यांची सुटका झाल्यानंतर पुन्हा वाद उफाळून आला.
बेदम मारहाण; घटनास्थळीच झाला मृत्यू
रात्री साडेआठच्या सुमारास आदित्य भोंडवे आणि आदित्य राऊळकर हे पैशांची मागणी करण्यासाठी पुट्टेवारच्या फळांच्या दुकानाजवळ गेले. तेथे दोन्ही गटांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आरोपींनी दोघांवर हल्ला चढवला. फळांच्या दुकानाजवळ पडलेल्या मोठ्या दगडाने तसेच इतर हत्यारांच्या साहाय्याने दोघांच्या डोक्यावर आणि शरीरावर वारंवार प्रहार केले. जीव वाचविण्यासाठी त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला; मात्र हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, मारामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. गँगवॉर, जुने वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी संबंधित घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेष म्हणजे 24 तासांच्या कालावधीत तीन खुनांच्या घटना घडल्याने नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Nashik Crime: पैसे आण नाहीतर…,पैशांसाठी विवाहितेचा छळ, अखेर शेततळ्यात उडी घेत जीवन संपवलं






