संग्रहित फोटो
वडगाव मावळ : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान घणाघाती भाषण करत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी पाणीपुरवठा, सार्वजनिक सुरक्षाव्यवस्था आणि अमली पदार्थांचा वाढता प्रभाव यासंदर्भात जोरदार मागणी केली.
जल जीवन मिशनअंतर्गत पुणे जिल्ह्यात १२३९ योजना मंजूर असून, २०९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच एमजीपी अंतर्गत १६७ योजनांसाठी ४००० कोटी रुपये तरतूद आहे. मात्र, या योजनांपैकी ३५ ते ४० टक्के योजना अर्धवट स्थितीत आहेत. त्यांनी या अपूर्ण राहिलेल्या योजनांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत सरकारने केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी केली. पर्यटनस्थळे आणि गर्दीच्या ठिकाणीही हे कॅमेरे बसवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ग्रामीण भागात हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते. दारूबंदीबाबत कठोर उपाययोजना राबवाव्यात आणि फक्त दारू विकणाऱ्यांवरच नव्हे, तर दारू तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
शाळा-कॉलेजजवळील पानटपऱ्या हटविण्याची मागणी
शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात असलेल्या पानटपऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचा सहज संपर्क होतो. त्यामुळे अशा टपऱ्या तातडीने हटवण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार शेळके यांनी अधोरेखित केले.