सौजन्य - नवराष्ट्र टीम
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक १३ येथे झालेल्या निघृण खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या १२ तासांत करण्यात जयसिंगपूर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर पथकाने वेगवान कारवाई करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना पकडण्यात यश मिळवले. तपासादरम्यान पथकाने खुनातील प्रमुख आरोपी शेखर महादेव पाथरवट (वय ३०) आणि सागर परशुराम कलकुटगी (वय ३१) यांना बसवाना खिंड तमदलगे परिसरातून तर इतर दोन आरोपी विजय लक्ष्मण पाथरवट (वय ४३) आणि संजय लक्ष्मण पाथरवट (वय ४७) यांना चौडेश्वरी फाटा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. सर्व आरोपी जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.
आरोपींना जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेसाठी पथकाने मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ,पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, शेष मोरे, तसेच पोलीस अंमलदार निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, महेश खोत, संजय कुंभार, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी, लखन पाटील आणि हंबीरराव माने यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. या जलद आणि शिताफीने केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांतून पोलिसांचे कौतुक व्यक्त होत आहे.






