जालन्याच्या गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा; दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान (Jalna Crime)
जालना : जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्षे शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना मंगळवारी (दि.4) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली. दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून, परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केले.
पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत केले असून, गांधीनगर परिसरामध्ये सध्या शांतता आहे. या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले. सध्या मुस्लीम धर्मियांचा रमजान महिना चालू असून, सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेस गालबोट लागू नये, शहरात शांतता कायम राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप भारती, कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलिसी निरीक्षक सिध्दार्थ माने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश ऊनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, दोन्ही गटाकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येत असून, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच जो कुणी शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच सदरील प्रकरण हे हिंदू-मुस्लिम नसून शेजारी राहणाऱ्या युवकांमधील किरकोळ कारणावरील भांडण असून, शहरांमध्ये कोणीही अशा प्रकारची अफवा पसरवू नये आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले. सध्या गांधीनगर भागात पोलीसांचा फौजफाटा तैनात असून, परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यास पोलीसांना यश आलेलं आहे.