पोलीस ठाण्यांमध्ये ‘खाजगी माणसांची’ परंपरा कधी थांबणार? नागरिकांकडून प्रश्नचिन्ह
माहितीनुसार, काही पोलीस ठाण्यांमध्ये हे खाजगी लोक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत दिवस-रात्र पोलीस ठाण्यातच वावरत असतात. काही वेळा ते अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गाड्या धुणे, गाडीतून, साहेबांचा गाडी चालवणे, सामान आणणे, साहेबांसाठी जेवण आणणे अशी कामे करत असल्याचेही सांगितले जाते.
काही ठिकाणी या व्यक्तींना ‘पोलीस मित्र’ अशी ओळख दिली जात असल्याचेही समोर आले आहे. मात्र हे लोक नेमके कोण आहेत, त्यांची अधिकृत भूमिका काय आहे, तसेच त्यांना कोणत्या अधिकारावर पोलीस ठाण्यांमध्ये वावर करण्याची परवानगी दिली जाते, याबाबत स्पष्टता नाही. या व्यक्तींवर होणारा खर्च कोण करतो—संबंधित अधिकारी-कर्मचारी की शासन—हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नुकताच खारघर परिसरातील निर्भया पथकाच्या वाहनासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये कथितपणे एका खाजगी व्यक्तीकडून पोलीस वाहन चालवले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलीस ठाण्यांमध्ये खाजगी व्यक्तींच्या सहभागाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
काही नागरिकांचे म्हणणे आहे की, काही वेळा हे खाजगी व्यक्ती ‘कलेक्टर बॉय’ किंवा मदतनीस म्हणून अधिकारी-कर्मचाऱ्यांची वैयक्तिक कामेही करताना दिसतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सखोल चौकशी करावी आणि स्पष्ट नियमावली तयार करावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे अशा खाजगी व्यक्तींची माहिती घेणार का आणि ही परंपरा थांबवण्यासाठी काही ठोस पावले उचलली जाणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.






