महिलेचा मोबाईल हॅक केला अन् दीड लाखांना गंडा घातला; परस्पर पैसे काढत गेला नंतर...
ठाणे : मुंब्रा येथे एका सुशिक्षित महिलेचा मोबाईल हॅक करून सायबर भामट्यांनी तिला आणि तिच्या पतीला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दोघांच्या बँक खात्यांमधून तब्बल १ लाख ३४ हजार रुपये ऑनलाईन लांबवले आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवल्यानंतर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखत अब्दुल खालीद शेख (वय ३०, रा. मुंब्रा-कौसा) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. बी. कॉमचे शिक्षण पूर्ण केलेल्या निखत या एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्या गेल्या दोन वर्षांपासून मुंब्रा परिसरात कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात. निखत यांचे डीसीबी बँकेत, तर त्यांचे पती अब्दुल खालीद शेख यांचे अॅक्सिस बँकेत खाते आहे. १ लाख ३४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोबाईल अचानक झाला अपडेट आणि रिबूट
२७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निखत यांचा मोबाईल अचानक ऑटोमॅटिक अपडेट झाला आणि रिबूट (बंद होऊन चालू) झाला. सुमारे एका तासानंतर रात्री साडेआठच्या सुमारास फोन सुरू झाला, तेव्हा फोनमधील सर्व अॅप्लिकेशन्स गायब झाले होते. त्यामुळे निखत यांनी सर्व अॅप्स पुन्हा डाउनलोड केले. दुसऱ्या दिवशी निखत यांच्या बहिणीने रिचार्जसाठी पैसे मागितले.
बॅलेन्स तपासला अन्…
सायंकाळी साडेचार वाजता बँक खात्याचा बॅलन्स तपासला असता, त्यांच्या खात्यातून ८८ हजार रुपये परस्पर वळते झाल्याचे उघडकीस आले. निखत यांनी गुगल पेची हिस्ट्री तपासली असता, ७० हजार रुपये ‘बिकाश पासवान’ नावाच्या व्यक्तीच्या खात्यात, तर १८ हजार रुपये त्यांच्या पतीच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. तसेच ४० हजार रुपयांचे एक ट्रान्झेंक्शन फेल झाले होते.
पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकारानंतर त्यांनी तातडीने पतीच्या अॅक्सिस बँकेच्या खात्याची माहिती तपासली. सायबर चोरांनी त्यांच्या पतीलाही सोडले नव्हते. पतीच्या खात्यातूनही ६४ हजार रुपये भामट्यांनी उडवले होते. यामध्ये ५० हजार रुपये ‘सत्यम मिश्रा’ आणि १४ हजार रुपये ‘शेख रुखसार इम्तियाज’ नावाच्या व्यक्तींच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. या खात्यावरूनही दोन व्यवहार रद्द झाले होते. भामट्यांनी मोबाईल हॅक करून एकूण १ लाख ३४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सायबर सेलच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.
रावेतमधील गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; बिश्नोई गँगच्या तीन जणांना उत्तराखंडमधून पकडले






