( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर २०१४ मध्ये कोसळलेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. एका रात्रीत अख्खे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. याच हृदयद्रावक सत्यघटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा मराठी चित्रपट २४ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, नुकताच या चित्रपटाचा थरारक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनचे संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्तात्रय गायकर आणि राजू राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शनतर्फे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, अक्षय म्हात्रे आणि राजू राणे यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
चित्रपटाची संकल्पना, कथा आणि पटकथा राजू राणे यांची असून, दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाचे छायांकन राजा फडतरे यांनी केले असून, गीतलेखन आणि संगीताची धुरा युवराज गोंगले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला अधिक भावनिक बनवतात. कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर, तर व्हीएफएक्स रहमान अब्दुल्ला यांनी साकारले आहेत. महेश भारंबे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
सत्य घटनेचा वास्तववादी अनुभव
‘एक होतं माळीण’ हा चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित असल्याने त्याच्या निर्मितीदरम्यान दिग्दर्शक राजू राणे यांनी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून अनेक माहिती संकलित केली. त्या आधारे वास्तवाला शक्य तितक्या जवळ जाणारे कथानक उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण बदलापूर येथे करण्यात आले असून, कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर यांनी उभारलेला माळीण गावाचा भव्य सेट विशेष लक्षवेधी ठरतो. दमदार अभिनय, प्रभावी व्हीएफएक्स, हृदयस्पर्शी संगीत आणि वास्तववादी मांडणी यामुळे टीझर पाहतानाच प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात.
एका रात्रीत संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाल्यानंतर त्या ग्रामस्थांवर कोणती भीषण वेळ आली असेल, त्यांच्या स्वप्नांचा कसा चुराडा झाला असेल, याची वेदना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे २४ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.






