फोटो सौजन्य - Social Media
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत आता क्रांतीपर्वाची दमदार सुरुवात होणार आहे. स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आता उलगडणार आहे. समाजातील जातीभेद, अन्याय आणि अंधश्रद्धा यांना छेद देत ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ हा विचार रुजवण्याचा संघर्ष या पुढील भागांत अधिक प्रभावीपणे दाखवला जाणार आहे.
या खास टप्प्यासाठी मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर यांची दमदार एण्ट्री होत आहे. मधुराणी गोखले प्रभुलकर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांनी या भूमिकेला मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. “आज आपण शिक्षण आणि स्वातंत्र्याचा जो लाभ घेतो, तो सावित्रीबाईंनी केलेल्या संघर्षामुळेच,” असे त्या म्हणाल्या. या भूमिकेबद्दल उत्सुकता, आनंद आणि दडपण अशा संमिश्र भावना असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.
तर डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी ही भूमिका साकारणे हे मोठे आव्हान असल्याचे सांगत, “‘कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अश्या क्रांतीकाराचे विचार पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त केले.
या पुढील भागांमध्ये केवळ कथा पुढे जाणार नाही, तर एक सामाजिक क्रांती कशी आकाराला आली, याचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. स्त्रिया आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई आणि जोतीराव यांनी केलेला संघर्ष, त्यांना आलेला विरोध आणि त्यांनी दाखवलेले धैर्य याचे प्रभावी चित्रण पाहायला मिळणार आहे.
प्रेक्षकांसाठी ही मालिका केवळ मनोरंजन न राहता प्रेरणादायी ठरणार असून, ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होत आहे.






