India Census 2027: देशाच्या जनगणनेचे बिगुल वाजले! एप्रिल २०२६ पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात
India Census 2027: भारतातील जनगणेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त, मृत्युंजय कुमार नारायण यांनी २०२७ च्या जनगणनेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जनगणनेची तयारी आता प्रगत टप्प्यावर पोहोचली आहे आणि अवघ्या काही दिवसांतच अनेक राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील – घरांची यादी आणि गृहगणना – क्षेत्रीय कामाला सुरुवात होईल. जनगणना दोन टप्प्यांत घेतली जाते आणि यावेळी माहिती संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल.”
“या प्रक्रियेत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावतात. जमिनीवरील काम पूर्ण करण्यासाठी त्यांची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली जाते. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना आहे. ही जनगणना पूर्णपणे गोपनीय असून तिची माहिती आरटीआयद्वारेही सार्वजनिक केली जाणार नाही. राज्य सरकारची यंत्रणा ही जनगणना प्रक्रिया पार पाडेल. ही जनगणना प्रक्रिया गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली जाईल, ज्यांचे मंत्रालय राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश जारी करेल.” असंही मृत्युंजय कुमार नारायण यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले की, २०२७ च्या जनगणनेच्या उद्देशासंदर्भातील राजपत्र अधिसूचना १६ जून २०२५ रोजी जारी करण्यात आली होती. पहिल्या टप्प्याच्या कालावधीसंदर्भातील अधिसूचना ७ जानेवारी २०२६ रोजी जारी करण्यात आली होती. जनगणनेची घरांची यादी तयार करण्याची प्रक्रिया एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान पूर्ण केली जाईल. पहिल्या टप्प्यातील प्रश्नांसाठीची अधिसूचना २२ जानेवारी २०२६ रोजी जारी करण्यात आली होती, तर दुसऱ्या टप्प्याचा कालावधी आणि प्रश्नांसाठीची अधिसूचना नंतर जारी केली जाईल. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जात जनगणना केली जाईल. सरकारने जनतेला जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
“यावेळी, स्वयं-गणनाच्या नवीन प्रणालीद्वारे, लोक स्वतःच संबंधित माहिती नोंदवू शकतील. यावेळी जनगणना जातीनुसार घेतली जाईल. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान पार पडेल, ज्यामध्ये केरळ, तामिळनाडू आणि त्रिपुरासह अकरा राज्यांचा समावेश असेल. जनगणनेसाठी एकूण ११,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनगणनेसाठी एक माहितीपुस्तिका तयार करण्यात आली असून १९ भाषांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोळा भाषांमध्ये जनगणना ॲप विकसित करण्यात आले आहे.” अमसही त्यांनी नमुद केलं.
केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी (घरनोंदणी आणि गृहगणना) प्रश्नावली अधिसूचित केली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने घराची रचना आणि कुटुंबाच्या राहणीमानावर आधारित ३४ प्रश्नांचा समावेश असेल.
घराची रचना: इमारत व जनगणना घर क्रमांक, घराच्या जमिनीसाठी, भिंतींसाठी आणि छतासाठी वापरलेले मुख्य साहित्य.
कुटुंबाची माहिती: कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग आणि कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या.
राहणीमान व गरजा: घरात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या, सेवन केल्या जाणाऱ्या धान्याचा प्रकार आणि पिण्याच्या पाण्याची सोय.
सुविधा आणि मालमत्ता: मूलभूत व आधुनिक गरजांची उपलब्धता, तसेच कुटुंबाच्या मालकीच्या वाहनांचा प्रकार.
देशाच्या १६ व्या जनगणनेसाठी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांबाबत एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
जर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे दोन व्यक्ती एकमेकांना आपले ‘कायमचे जोडीदार’ मानत असतील, तर जनगणनेदरम्यान त्यांना विवाहित जोडप्यांप्रमाणेच ग्राह्य धरले जाईल.
जनगणनेची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी ‘स्व-गणना’ पोर्टलवर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (FAQs) यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हे पोर्टल ‘घरांची यादी व गृहनिर्माण’ (HLO) आणि ‘लोकसंख्या गणना’ या दोन्ही टप्प्यांसाठी उपलब्ध असेल.
नागरिकांना जनगणनेच्या प्रश्नांची उत्तरे सहज देता यावीत आणि बदलत्या सामाजिक रचनेनुसार अचूक माहिती संकलित व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.






