भारत इतिहास काळापासूनच मंदिरांनी, वास्तुशिल्पांनी संपन्न असा भाग राहिलेला आहे. आपल्या या भारताच्या भूमीवर अनेक राज्यं, साम्राज्य, सल्तनती होऊन गेल्या; तेव्हा राजेशाही-हुकूमशाही होती आता लोकशाही आहे. पण बऱ्याच अंशी काही गोष्टी बदलत नसतात. इतिहासात जे राजे सम्राट होऊन गेले. त्यांनी आपल्या राज्याची साम्राज्याची ख्याती दूरपर्यंत पसरावी. आपली प्रबळता, आपल्या राज्याचा प्रचार आणि शक्ती प्रदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. किंबहुना तो आजही केला जातो आणि प्रत्येक क्षेत्रात केला जातो. या प्रचार आणि शक्ती प्रदर्शनालाच आजच्या वेळेत प्रॉपगेंडा असं म्हटलं जातं, जो सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या माध्यमांतून धोरणात्मक दृष्टीने पसरवला जातो. प्रत्येक धोरणांमध्ये विशिष्ट कारण लपलेली असतात.
शक्तीप्रदर्शन आणि प्रचार
भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन काळात वेगवेगळे राजवंश उदयाला आले; समृद्धीच्या शिखरावर पोहोचले आणि लयास गेले. मग त्यामध्ये गुप्त, चोल, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट अशा बऱ्याच मोठ्या राजवंशांची नावे घेता येतील. प्रत्येकाच्या महत्त्वकांक्षांनी आपसी वैरांनी, एकमेकांबरोबर युद्ध करून आपापल्या राजवंशाची अस्तित्व टिकवण्याच्या चळवळीत बरीच हानी करून घेतली. या सगळ्यात मात्र, प्रत्येकाने आपली शक्ती संपत्ती दाखवण्याचा कसून प्रयत्न केला, ज्यामध्ये खूप जण यशस्वीही ठरले. भारतात प्राचीन आणि पूर्व मध्ययुगीन काळात जे शक्तिप्रदर्शन केलं जायचं ते मोठमोठे बलाढ्य मंदिर बांधून. त्या मंदिरांची संपन्नता, ऐश्वर्य, रीती रिवाज, स्थापत्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय यायचा. प्रदेशातील प्रवासही यायचे. या माध्यमातून त्या मंदिरांची, वास्तुशिल्पांची ख्याती तर पसरायचीच पण बरोबरच त्या राजाची, राज्याची समृद्धीची चर्चा दूरपर्यंत पसरायची.
काय आहे वेद-पुराणांमधील अश्वमेध यज्ञ? या पौराणिक आणि ऐतिहासिक विधीमागील सत्य जाणून घ्या!
वेरूळचे कैलाशनाथ मंदिर
याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे वेरूळचे कैलाशनाथ मंदिर ई.स. 757 ते 775 मध्ये म्हणजे जवळपास आठव्या शतकात राष्ट्रकुट राजा कृष्ण पहिला यांनी या मंदिराची निर्मिती केली. 18व्या शतकात चालुक्य आणि राष्ट्रकूट राज्यातील युद्धांमध्ये राजा दंतीदुर्गाने चालुक्यांचा पराभव केला. या विजयाच्या स्मरणार्थ आपल्या धोरणात्मक गोष्टींना लक्षात ठेवून राष्ट्रकूट राजाच्या राजवंशाचा विस्तार करण्यासाठी वेरूळच्या लेण्यांमधील हे कैलाशनाथाचे मंदिर, राजा दंतीदुर्गाचा उत्तराधिकारी राजा कृष्ण पहिला याने बांधले. हे मंदिर स्वतःमध्ये एक आश्चर्य आहे. एकाश्म, म्हणजे एकाच दगडात वरून खाली पर्यंत कोरलेले हे मंदिर शिल्पकलेचा आणि प्राचीन वास्तू कलेचा अनन्यसाधारण उदाहरण म्हणून उभं आहे. या मंदिरा द्वारे राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांना एका प्रकारे आपल्या सत्तेचं धोरणात्मक शक्ती प्रदर्शन केलं. पुढच्या काही तीन मुद्द्यात आपण ते समजून घेऊयात.
धार्मिक प्रचार
कैलासनाथ मंदिर जे हिंदू देवता भगवान शंकरांना समर्पित आहे. या दैवी शक्तीशी आपल्या राजवंशाची नाळ जोडून, आपल्या सत्तेला देवतांचा आशीर्वाद आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न यातून केलेला दिसतो. कैलासनाथ मंदिर फक्त धार्मिक प्रतीक नसून राष्ट्रकूट साम्राज्याच्या एकतेचे ही प्रतिक म्हणून सिद्ध झालं. या मंदिराचा निर्माण करून मोठ्या हिंदू समुदायाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा परंपरांना, रीतीरीवाजांना छत्र छाया देऊन राजा कृष्ण पहिला, याकडे धर्मरक्षकाच्या नजरेने पाहण्यात येऊ लागलं.
सांस्कृतिक प्रचार
कैलासनाथ मंदिरांसारख्या वास्तू बांधून सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील सर्वोच्चता दाखवण्याचाही प्रयत्न केला गेला असावा. या कैलाशनाथ मंदिराची व्याप्ती आणि नखशिकांत राष्ट्रकुटांच्या संपत्तीची, संसाधनांची प्रचिती घडवून आणतात. हे मंदिर उत्कृष्ट कला कारागिरी आणि धर्माला प्राधान्य देणाऱ्या राष्ट्रकूटांची महान प्रभावशाली प्रतिमा तयार करण्यासाठी अग्रेसर ठरलं.
राजकीय प्रचार
कैलाशनात मंदिर एकाच खडकात वरून खाली पर्यंत अव्वल दर्जाच्या शिल्पकामाने घडवण्यात आलं आहे. ते स्थानिक जनतेच्या बरोबरच परदेशी प्रवाशांना आणि बाहेरच्या लोकांनाही अचंबित करण्यासाठी होतं. यातून राष्ट्रकुटांच्या विशाल संसाधनांची शक्ती, कुशल कामगारांची प्रबळता, मोठमोठे बलाढ्य स्मारकांचे प्रकल्प उभारण्याची राजाची शक्ती चारही दिशांना प्रदर्शित झाली. आणि त्यापलीकडेही राष्ट्रकूटांच्या राजवंशाचा राजेशाहीचा भारतीय उपखंडाबरोबरच दुर दुरपर्यंत गौरव झाला. यातूनच राजकीय धोरणांचा प्रसार करण्यात आला.
आपल्या धोरणांचा प्रसार करण्यासाठी शक्ती प्रदर्शनासाठी वेळोवेळी अशी स्मारक बांधली गेली उदाहरणादाखल इजिप्त मधील गिजाचे पिरामिड, फ्रान्सचा आयफेल टावर, चीनची भिंत, ताजमहाल. इतकच काय मागच्या दशकात बांधले गेलेले बुर्ज खलिफाची इमारत. ही सगळीच स्मारकं राष्ट्रांच्या संस्कृतीची, संपत्तीची, प्रगतीची, शक्तीची प्रतीक आहेत. वेरूळचे कैलाशनाथ मंदिर ही राष्ट्रकूट राजवंशाच्या अशा धोरणात्मक गोष्टीचं प्रतीक होतं.






