नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानही पार पडले. आता चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या मंगळवारी (दि.14) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच उमेदवारीच्या एकदिवस आधी म्हणजे 13 मे रोजी ते ‘रोड शो’ देखील करणार आहेत.
वाराणसीमध्ये सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. तर या संपूर्ण निवडणुकांचे निकाल 4 जूनला लागणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी 13 मे रोजी संध्याकाळी वाराणसीला पोहोचतील. येथे ते भव्य रोड शो करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या उमेदवारी अर्जासाठी सर्व कागदपत्रांची तयारी प्रादेशिक समितीने सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक आठवडा आधी दिल्लीला पाठवला जाईल आणि त्यातली सगळी माहिती व्यवस्थित तपासली जाईल. त्यानंतर हा अर्ज स्थानिक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाईल, असेही सांगण्यात आले.
पंतप्रधान मोदींच्या विरोधात कॉंग्रेसचे अजय राय
पंतप्रधान मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कॉंग्रेस अजय राय यांना निवडणुकीत उतरविणार आहे. अजय राय यांनी 2019 मध्येही मोदी यांना लढत दिली होती. तर, कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.






