संग्रहित फोटो
आंबेगाव : आंबेगाव तालुक्यात मान्सूनच्या आगमनानंतर सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने भात पिकासह रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग आला असून, शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर समाधानाचे चित्र दिसू लागले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने त्याच्या प्रभावामुळे ३ ते ७ जुलैदरम्यान तालुक्यासह राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय शेती आजही मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरतो. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला आंबेगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पेरणीची कामे खोळंबली होती. काही भागांत जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना चालना मिळाली असून खरीप हंगामासाठी आवश्यक वातावरण तयार झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत असलेले डिंभा धरण तसेच अन्य धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. पश्चिम आणि पूर्व भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. उशिरा का होईना, पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे सुरू करण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठीही हा पाऊस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे बोलले जात आहे.
पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
मात्र, सध्याचा पाऊस दिलासादायक असला तरी अतिवृष्टीचे संकट निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. अतिपावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहण्याची गरज असल्याचेही जाणकारांचे मत आहे. यंदाच्या पावसावर एल निनोचा प्रभाव तसेच मान्सूनच्या वाऱ्यांची कमकुवत स्थिती याबाबत हवामान तज्ज्ञांनी यापूर्वीच संकेत दिले होते. त्यामुळे यंदाचा पावसाळा काहीसा अनिश्चित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाऊस होणे अत्यंत आवश्यक
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठा आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे केवळ पाणी नसून त्यांच्या कष्टाचे, आशेचे आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्याचे प्रतीक आहे. बियाणे, खते, मशागत यासाठी मोठी गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य वेळी पाऊस होणे अत्यंत आवश्यक असते. पाऊस लांबल्यास आर्थिक अडचणी वाढतात, तर वेळेवर झालेला पाऊस उत्पादनवाढीस चालना देतो.
हे सुद्धा वाचा : मावळमध्ये मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत; महामार्ग व रेल्वे वाहतूक ठप्प
ठोस उपाययोजना करण्याची गरज
हवामानातील बदल लक्षात घेता राज्य सरकार आणि प्रशासनाने जलसंधारण, पाणी व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मत जाधववाडी (ता. आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी महेश कुंडलिक जाधव यांनी व्यक्त केले. “केवळ पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा भविष्यातील जलसुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे,” असेही त्यांनी नमूद केले.






