सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. मध्य प्रदेशातील आमदार न्यायालय (Special MLA Court) अशा प्रकरणांची सुनावणी वेगाने करते, असेही त्यांनी नमूद केले.
जुन्या जामीनदाराचे निधन झाल्यामुळे हर्षवर्धन सकपाळ यांनी नवीन जामीन सादर केला.
माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, खटला कायदेशीररित्या लढला जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आमदारांशी संबंधित खटले फास्ट ट्रॅक’वर चालवले जातील.
Rahul Gandhi Bhiwandi Court: लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज ( 21 फेब्रुवारी) भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केलेल्या एका वक्तव्यावरून आरएसएस कार्यकर्त्यांने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज भिवंडी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राहुल गांधी यांना नवा जामीनदार देण्याच्या सुचना केल्या. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजसिंह पाटील हे या प्रकरणात राहुल गांधी यांचे जामीनदार होते.पण गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निधन झाल्याने राज्याचे विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना या प्रकरणात नवीन जामीनदार म्हणून सादर करण्यात आले.
‘माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”; राहुल गांधींच्या वकिलांनी सुनावणीनंतर स्पष्ट केली भूमिका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी न्यायालयाबाहेरील घडामोडी आणि कायदेशीर प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. न्यायालयातील सुनावणीबाबत माहिती देताना अय्यर म्हणाले की, ‘राहुल गांधींना यापूर्वी जामीन देणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेनुसार नवीन जामीनदार देणे आवश्यक होते. आता हर्षवर्धन सकपाळ यांनी राहुल गांधींसाठी जामीन सादर केला असून, न्यायालयाने नवीन सुरक्षा (Surety) मंजूर केली आहे.
दरम्यान, “राहुल गांधी ( Rahul Gandhi) या प्रकरणात माफी मागून खटला निकाली काढणार का?” या प्रश्नावर नारायण अय्यर यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. ते म्हणाले, “माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आजची प्रक्रिया ही केवळ जामीन आणि नवीन सुरक्षा पुरवण्यापुरती मर्यादित होती. आम्ही न्यायालयाच्या निर्देशानुसार कायदेशीर लढाई लढत आहोत.”
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. मध्य प्रदेशातील आमदार न्यायालय (Special MLA Court) अशा प्रकरणांची सुनावणी वेगाने करते, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता मार्च महिन्यात होणार आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भिवंडी न्यायालयीन हजेरीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीपासून भिवंडीपर्यंत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निदर्शनांची मालिका पाहायला मिळाली.
शुक्रवारी काँग्रेसच्या (Congress) युवा संघटनेने (IYC) एअर इंडिया समिटमध्ये केलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाला. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयाकडे कूच करत घेराव घालण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी भिवंडी न्यायालयाकडे जात असताना, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरुद्ध केलेल्या घोषणाबाजीचा हा प्रतिशोध असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. भिवंडी न्यायालय परिसरात बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि श्वान पथकाद्वारे (Dog Squad) सखोल तपासणी करण्यात आली.
न्यायालय आणि आजूबाजूच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणा ड्रोन आणि गुप्तचर विभागाच्या माध्यमातून परिसरावर लक्ष ठेवून होत्या. व्हीव्हीआयपी (VVIP) सुरक्षेच्या नियमांनुसार केवळ अधिकृत व्यक्तींनाच न्यायालय कक्षात प्रवेश दिला जात होता.
Web Title: There is no question of apologizing rahul gandhis lawyers clarify their position after the hearing