नीरा धरणसाखळीत ५० टक्के पाणीसाठा (फोटो- istockphoto)
नीरा/ लोणंद : नीरा धरणसाखळीत आजअखेरीस सरासरी ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४९ टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी या चार धरणांत सध्या २३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी निरा खोर्यातील शेतकर्यांना उन्हाळ्यातही शेतीला पाणी मिळणार आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही. या वर्षी पावसाळ्यात भाटघर, निरा देवघर, वीर ही तीनही धरणे शंभर टक्के भरली होती. आज रोजी भाटघरमध्ये १२.५०, नीरा देवघरमध्ये ४.७५, तर वीर धरणात ५ टीएमसी पाणीसाठा आहे. गुंजवणी धरणात २ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे.
शेतकऱ्यांना वेळेवर मिळणार पाणी
धरणसाखळीत मुबलक पाणीसाठा असल्याने निरा खोर्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळणार आहे. थोड्याच दिवसांत गहू, हरभरा, टोमॅटो, तसेच मागास कांदा पिकांची काढणी सुरू होईल. काढणी झालेल्या शेतात चारा पिकांचे उत्पादन घेता येणे पाण्याच्या उपलब्धतेमुळे शक्य होणार आहे. त्यामुळे जनावरांच्या हिरव्या चार्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पिण्याच्या पाण्याचा मिटणार
वीर धरणातून सासवड नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, नीरा नदीवरील मांडकी डोहातून जेजुरी नगरपालिका व औद्योगिक वसाहतीला देखील उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. नीरा नदी व डाव्या कालव्यावरून पुरंदरमधील लपतळवाडी, मांडकी, जेऊर, पिंपरे (खुर्द), पिसुर्डी, गुळुंचे, कर्नलवाडी, राख आदी गावांतील शेतकर्यांनी सहकारी उपसा सिंचन योजना राबवून शेतीसाठी पाणी नेले आहे. या शेतकर्यांना पाण्याची चिंता सतावणार नाही. वीर धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या वर्षी निर्माण होणार नाही.
जून महिन्यापर्यंत जरी पुरेसा पाऊस झाला नाही, तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकणार नाही. निरा नदीवरील बहुतांश बंधार्यांत समाधानकारक पाणीसाठा आहे. वीर धरणातून नीरा डावा कालव्यात ८२७ क्युसेकने, तर नीरा उजवा कालव्यात १ हजार ५५० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठचा व कालव्यावर शेती अवलंबून असलेल्या शेतकर्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.