उन्हाळ्यात आंबे खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर खरंच पिंपल्स येतात का? जाणून घ्या आंबे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण आंब्याची येते. रसाळ, नैसर्गिक गोडवा असलेले हापूस आंबे चवीला अतिशय सुंदर लागतात. आंब्याचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासोबत आंबे आवर्जून खाल्लले जातात. उन्हाळ्यात आंबे खाल्ल्याशिवाय ऋतू पूर्ण झाल्यासारखा अजिबात वाटत नाही. त्यामुळे कितीही महाग असलेले तरी प्रत्येक घरात आवर्जून आंबे आणले जातात. आंबे खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? आंब्यांमध्ये जास्त उष्णता असते का? असे अनेक प्रश्न तरुण वयातील मुलामुलींना पडतात. याशिवाय काही लोक शरीरात उष्णता वाढेल या भीतीने आंब्याचे सेवन करणे टाळतात.(फोटो सौजन्य – istock)
नैसर्गिक गोडव्याने समृद्ध असलेले हापूस आंबे चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. आंब्यांमध्ये विटामिन ए, सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पण काहींच्या चेहऱ्यावर आंबे खाल्ल्यानंतर पुरळ किंवा पिंपल्स येतात. ही समस्या चुकीच्या पद्धतीने आंबे खाल्ल्यामुळे उद्भवते. आंबे खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत पुरळ आणि पिंपल्स येण्यास कारणीभूत ठरते. याशिवाय कोणत्याही पदार्थांसोबत आंब्याचे सेवन करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घ्या आंबे खरंच उष्ण असतात का आणि आंबे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत.
आंब्यामध्ये नैसर्गिक उष्णता असते. ज्यामुळे भरपूर प्रमाणात आंबे खाल्ले जातात तेव्हा शरीरातील तापमानात वाढ होते. शरीरातील ही उष्णता त्वचेवाटे बाहेर पडून जाते. यामुळे काहींच्या चेहऱ्यावर पुरळ तर काहीवेळा चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. आंब्यामध्ये ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ खूप जास्त प्रमाणात असते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढून सिबम वाढतात आणि चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात.
बाजारातून विकत आणलेले आंबे मोठ्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात १ किंवा २ तास भिजत ठेवावे. यामुळे आंब्यांमध्ये असलेले फायटिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. आंब्यांमध्ये नैसर्गिक उष्णता कमी झाल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येत नाही. आंबे पाण्यात ठेवल्यामुळे ते सहज पचन होतात आणि त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.
आंबे जेवताना किंवा जेवणानंतर लगेच खाऊ नये. जेवल्यानंतर आंबा खाल्ल्यास पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो. खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे आंबे सकाळच्या वेळी किंवा दुपारी जेवणाच्या आधी खावे. तसेच उपाशी पोटी कधीही आंब्याचे सेवन करू नका. आंब्यांचा आमरस तयार करताना त्यात थोडस दूध आणि तूप टाकावे. यामुळे आंब्यांमधील उष्णता कमी होण्यास मदत होते. शरीरातील पित्त संतुलित राहून पचनाच्या समस्या उद्भवत नाही.






