पावसाळ्यात मुलांमध्ये वाढतेय पोटाची समस्या (फोटो सौजन्य - iStock)
पावसाळ्याच्या दिवसात हवेतील आर्द्रता, सांडपाणी साचणे, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ६ ते १० वयोगटातील मुलांमध्ये पोटाच्या समस्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही आठवड्यात पोटदुखी, पोटफुगी, उलट्या आणि जुलाब यासारख्या तक्रारींमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. वेळीच व्यवस्थापन केल्यास भविष्यातील गुंतागुत टाळता येऊ शकते. पालकांना सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
पावसाळा मुलांमध्ये पोटाच्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतो, जो एक चिंतेचा विषय ठरत आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते तसेच वाढत्या आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंची वाढ जलद गतीने होते. ज्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अजूनही विकसित होत नाही, ते विशेषतः असुरक्षित असतात. रस्त्यावरील उघडे अन्न पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधा होऊ शकते. सामान्य लक्षणांमध्ये पोटात दुखणे, मळमळ, उलट्या, अतिसार, गॅस आणि ताप यांचा समावेश आहे.
वेळीच उपाय गरजेचे
गेल्या ३-४ आठवड्यात, १० पैकी ७ बालरुग्ण ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि उलट्या अशा समस्यांसह ओपीडीमध्ये दाखल झाली होती. वेळीच उपचार न केल्यास, या परिस्थितीमुळे डिहायड्रेशन तसेच थकवा येऊ शकतो. वेळेवर योग्य निदान आणि उपचार जसे की ओआरएसचे सेवन करुन डिहायड्रेशन टाळणे, अँटीबायोटिक्स (जर आवश्यक असेल तर) आणि हलका व संतुलित आहार. उपचारास विलंब केल्यास लक्षणे आणखी बिघडू शकतात आणि मुलाच्या वाढीवर आणि दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. स्वच्छता आणि आहार नियंत्रणाद्वारे प्रतिबंध हा सर्वोत्तम मार्ग आहे अशी प्रतिक्रिया डॉ. सिद्धार्थ मदभूशी, नवजात शिशु तज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, औंध, पुणे यांनी व्यक्त केली.
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट क्रीम सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
पालकांनी काय करावे
डॉ. मदभूशी पुढे सांगतात की, पालकांनी खात्री करावी की तुमची मुलं गाळून,उकळून थंड केलेल्या पाण्याचे सेवन करत आहेत. उघड्यावरील अन्न पदार्थ, कच्चे सॅलड आणि कापलेली फळे टाळावीत. घरी शिजवलेले ताजे व गरम अन्न, दहीसारख्या प्रोबायोटिक्ससह हलके जेवण द्यावे, जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवावे, मुलांना हायड्रेट ठेवावे आणि जंक फूड जास्त प्रमाणात खाणे टाळावे. शिवाय वरील लक्षणे २४ तासांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कशी काळजी घ्यावी?
अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनच्या आहारतज्ज्ञ अंजली शिंदे सागतात की, पावसाळ्याच्या दिवसात थंडीचे प्रमाण सतत कमी-जास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरातील क्रियांवरही होत असतो. या दिवसात पचनशक्ती तसेच रोगप्रतिकारशक्ती मंदावते. पावसाळ्यात जलजन्य आजार टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी.
पालकांनी आपल्या मुलांची नखे वेळोवेळी कापावीत आणि स्वच्छ रहावीत याची खात्री करावी. स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या, कडधान्य, डाळी तसेच खाण्यापूर्वी फळे स्वच्छ धुवून घ्या. चिखलात अथवा साठून राहिलेल्या पाण्यात मुलांना अनवाणी पायाने खेळू देऊ नका. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांनी पावसाळ्यात व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. हे खाल्ल्याने मुलांना आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. दैनंदिन आहारात संत्र, आवळा,पेरु, मोसंबी, पपई,किवी, अननस अशा व्हिटॅमिन सी फळांचा समावेश करावा.
फॅटी लिव्हर असो वा डायबिटीस, स्वयंपाकघरात मिळेल प्रत्येक आजाराचा उपाय; डॉक्टरांनी दिला रामबाण इलाज