मुंबई-गोवा हायवेवर ३ टोलनाके! प्रवाशांच्या खिशावर आता तिहेरी भार; वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी
Mumbai-Goa Highway Toll: मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नसताना आता प्रवाशांवर तीन टोलचा भार टाकण्याची तयारी सुरू झाल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपूर्ण रस्ता, निकृष्ट दर्जाचे गावाकडचे मार्ग आणि अपुऱ्या सुविधा यामुळे आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांना आता तीनदा टोल भरावा लागणार असल्याची माहिती समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे. महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या सुमारे ९० किमीच्या अंतरात खारपाडा आणि खांब या दोन ठिकाणी टोल नाके उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना एका प्रवासात दोन ठिकाणी टोल भरावा लागणार आहे.
पुढील टप्प्यात पोलादपूर जवळ लोहारे येथेही टोल वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आले असून सिग्नल यंत्रणा सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे “रस्ता पूर्ण नसताना टोल कशासाठी?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल वसुली सुरू करण्याची घाई का ? रस्त्यावर अजूनही खड्डे, अपूर्ण पूल, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा असताना प्रवाशांकडून टोल आकारणे योग्य आहे. का? असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. हा महामार्ग बनविण्यासाठी जेवढी वर्षे लागतील तेवढी वर्षे टोल आकारणी करु नये. या महामार्गावर अपघातांमध्ये हजारो निष्पाप आणि निरपराध लोकांचे हकनाक बळी गेले आहेत. टोल आकारण्याची घाई करू नये. याबाबत सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि रुंदीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले. मात्र निधीअभावी, पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनातील अडचणी आणि ठेकेदारांच्या निष्क्रयतेमुळे हे काम वर्षानुवर्षे रखडत गेले. तब्बल १६ वर्षांहून अधिक काळानंतरही महामार्गाचे अनेक भाग अपूर्ण असून काही ठिकाणी अजूनही काम सुरूच आहे. टोलचे दर किती असतील? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांत याबाबत अधिसूचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. टोल सुरू झाल्यानंतर वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील लाखो लोकांसाठी जीवनरेखा मानला जातो. पर्यटन, व्यापार आणि दैनंदिन प्रवासासाठी या मार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारावा व सुलभशौचालय, स्ट्रीट लाईट, चार्जिंग, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अपूर्ण रस्त्यावर टोल वसुलीचा निर्णय घेतल्यास तो कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरेल, अशी भावना सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे.






