सौजन्य - नवराष्ट्र टीम
भोर : भोर- रामबाग मार्गालगत असणाऱ्या न्यू बालाजी सुपर मार्केट किराणा मालाच्या दुकानाला रविवारी (दि. ९) अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यू बालाजी सुपर मार्केटसह शेजारील टिशू पेपर दुकान, हॉटेल, मोबाईल शॉपी दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
न्यू बालाजी सुपर मार्केट किराणा मालाच्या दुकानाला अचानक आग लागून दुकान पूर्णतः भस्मसात झाले असून, आगीने रौद्ररूप धारण केल्याने सुपर मार्केटच्या शेजारील टिशू पेपर दुकान, हॉटेल, मोबाईल शॉपीचेही आगीत मोठे नुकसान झाले आहे. अचानक आग लागल्याचे शेजारील दुकानदाराच्या लक्षात आल्याने दुकानदाराने स्थानिकांना सांगितले. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आग आटोक्यात येत नसल्याने तात्काळ भोर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. स्थानिकांनी आग विझवताना आगीच्या लोटातून तेल डब्बे तसेच शीतपेयाच्या बॉटल्सला आग लागल्याने मोठ -मोठे फटाक्यांसारखे आवाज होऊ लागले, त्यामुळे काही वेळ स्थानिकांना आग विझवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. अग्निशमन दल तसेच भोर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचा प्रयत्न केला. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
या घटनेत सुपर मार्केटचे होलसेल व्यापारी भूषण गावडे (शिरवळ) यांचे ३० लाखाचा किराणामाल तर ३ लाख ५० हजारांची रोकड आगीत भस्मसात झाली. टिशू पेपर दुकानदार सोहम पवार (भोर) यांचे २ लाख, हॉटेल मालक नवनाथ ओंबळे (वाकांबे )१ लाख तर मोबाईल शॉपीच्या निखिल तळेकर (उत्रोली) यांचे ५० हजारांच्या साहित्याचे आगीत जळून नुकसान झाले. भोर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आगीत जळालेल्या दुकानांचा पंचनामा केला. एकीकडे व्यवसाय मंदावले असतानाच अशी घटना घडल्याने तालुक्याच्या सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आगीचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.
पुण्यात शाळेच्या बसला भीषण आग
पुण्यात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहरातील खराडी परिसरात गुरुवारी शाळेच्या बसला आग लागली आणि या घटनेत किमान 15 विद्यार्थी होते, विद्यार्थी सुरक्षित बचावले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, तुळजा भवानी नगर परिसरात दुपारी ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, यावेळी विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर त्यांच्या घरी जात होते. चालक शाळेच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना दुपारी 2.45 च्या सुमारास वाहनातून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ बस थांबवली आणि उपस्थित लोकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले. विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर चालकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने संपूर्ण बस जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.