फोटो सौजन्य: iStock
अहिल्यानगर मधील जामखेड तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून चढ्या दराने विक्री केली जात असल्याची गंभीर चर्चा सध्या शेतकरी वर्तुळात सुरू आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर युरियाची नितांत गरज असताना शेतकऱ्यांना अवाजवी दर मोजून खत खरेदी करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी काळाबाजाराला अभय मिळत असल्याचा आरोपही होत आहे.
तालुक्यातील ४३ कृषी सेवा केंद्रांना नुकताच ५४० टन युरियाचा पुरवठा करण्यात आल्याची अधिकृत माहिती आहे. मागील दोन महिन्यांत सुमारे २५० टन युरिया वितरित करण्यात आला होता. यानुसार सुमारे २९० टन साठा शिल्लक असताना शेतकऱ्यांना “युरिया उपलब्ध नाही” असे सांगितले जात असल्यास अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
दैनिक ‘नवराष्ट्र’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ४५ किलोच्या युरिया बॅगसाठी २६६ रुपये आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. शासननिर्धारित दरानुसारच सर्व केंद्रांवर विक्री होते का, की काही ठिकाणी जास्त दर आकारला जातो, हा तपासाचा विषय ठरत आहे. काही केंद्रचालकांकडून शेजारच्या तालुक्यातील शेतकरी जास्त दर देऊन खत खरेदी करतात, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नाही, असा दावा केला जात आहे. मात्र अधिकृत साठा पुरेसा असताना वितरणावर प्रभावी नियंत्रण का नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
Pune Airport वर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबताय? वाहनचालकांनो सावधान; थेट…
खत खरेदी करताना अधिकृत पावती अवश्य घ्यावी.
शासननिर्धारित दराची माहिती केंद्रावर दर्शवलेली आहे का, याची खात्री करावी.
जास्त दर आकारला जात असल्यास लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे पुराव्यासह करावी.
जामखेड तालुका कृषी अधिकारी शीतल पाचर्णे यांनी मागील दोन महिन्यांतील केंद्रनिहाय पुरवठ्याची माहिती देत तालुक्यात युरियाची टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याच्या तक्रारीमुळे प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डीएचओ मानांकनात राज्यात बुलढाणा तृतीय! अमरावती परिमंडळात द्वितीय स्थान; आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती
२४ जानेवारी २०२६ च्या शासन परिपत्रकानुसार युरियाच्या बॅगेचे पॅकिंग ४५ किलोवरून ४० किलो करण्यात आले आहे. किंमत २६६ रुपयांवरून २५४ रुपये करण्यात आली असली, तरी प्रतिकिलो दर ५.९९ रुपयांवरून ६.३४ रुपये इतका वाढला आहे. त्यामुळे बॅगचे वजन कमी आणि प्रतिकिलो दर वाढ, अशी दुहेरी कात्री शेतकऱ्यांच्या खिशाला बसत आहे.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून अचानक तपासणी मोहीम राबवावी, केंद्रचालकांकडील साठा व विक्री नोंदींची पडताळणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.






