१६ वर्षांनी जनगणनेचा बिगुल! नागरिकांना ३३ प्रश्न विचारणार; माहिती राहणार गोपनीय (फोटो सौजन्य-Gemini)
अमरावती: २०११ नंतर तब्बल १६ वर्षांनी भारताची जनगणना २०२७ मध्ये पुन्हा एकदा मार्गी लागणार असून कोरोना काळामुळे रखडलेली ही प्रक्रिया आता वेग घेत आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४ हजारांहून अधिक प्रगणक घराघरांत जाऊन माहिती संकलित करतील. यावेळी जनगणनेत ३३ महत्त्वाचे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहे व सर्व माहिती मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन नोंदवली जाईल. जनगणना प्रशिक्षण सोमवारपासून सुरू होत असून ते ३ दिवस चालणार आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत हाऊस लिस्टिंग ब्लॉक (एचएलबी) अंतर्गत कामे सुरू असून साधारणपणे ७०० ते ८०० लोकसंख्येचा एक एचएलबी राहणार आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जनगणनेदरम्यान प्रगणक नागरिकांना घराची रचना, सुविधा, कुटुंबाची रचना, शिक्षण, संपर्क सुविधा यासह विविध सामाजिक-आर्थिक बाबींवर प्रश्न विचारणार आहेत. सर्व माहिती थेट मोबाइलमधील प्रगणकाच्या अल्पमध्ये नोंदवली जाईल. या सर्व प्रक्रियेतर प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा जगनगणना अधिकारी तथा आरडीसी यांचे नियंत्रण राहील. माहिती घरसूची व गृहगणना अनुसूचीद्वारे गोळा केली जाईल, जनगणनेतील सर्व माहिती गोपनीय राहणार आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी २२ जानेवारीला अधिसूवना जारी केली. त्यानुसार, जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत नियुक्त प्रगणक घराघरांत जाऊन माहिती संकलित करतील.
या जनगणनेतील सर्वात महत्त्वाचा व चर्चेचा मुद्दा म्हणजे पहिल्यांदाच जातनिहाय नोंदीचा आहे. कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किवा इतर प्रवर्गातील आहे का, याची अधिकृत नोंद केली जाणार आहे. यामुळे भविष्यातील धोरणे, विकास आराखडे आणि शासकीय योजनांचे नियोजन अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे.
प्रगणकांद्वारे घरातील खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत व उपलब्धता, प्रकाशाचा स्रोत, शौचालय व स्नानगृहाची उपलब्धता, सांडपाणी निचरा व्यवस्था, स्वयंपाकघर व एलपीजी/पीएनजी कनेक्शन, तसेच स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन याचीदेखील माहिती घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात १ एप्रिलपासून जनगणना सुरू होईल. त्यापूर्वी संबंधित तहसीलदार व सीओ तालुक्यातील प्रगणकांची नियुक्ती करतील, प्रगणक हे शासकीय व निमशाकीय कर्मचारी राहणार आहे. यासाठी त्यांना मानधन मिळेल.
जनगणनेत रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, लॅपटॉप किंवा संगणक, दूरध्वनी, मोबाइल व स्मार्टफोनची उपलब्धता, तसेच सायकल, दुचाकी, चारचाकी वाहनांची माहिती नोंदवली जाणार आहे. कुटुंबात वापरले जाणारे मुख्य धान्य आणि जनगणनेशी संबंधित संवादासाठी मोबाइल क्रमांकही विचारला जाईल. जनगणनेच्या नोंदीसाठी प्रगणकांना त्यांच्या मोबाइलमध्ये संबंधित अप डाऊनलोड करावे लागेल व हे अॅप जीपीएसबेस राहणार आहे.
प्रगणक घराचा क्रमांक, जनगणना घराचा क्रमांक, घराच्या फरशी, भिंती व छतासाठी वापरलेले साहित्य, घराचा वापर व स्थिती याबाबत माहिती घेतील. कुटुंबाचा क्रमांक, कुटुंबातील एकूण सदस्यसंख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव व लिंग, सामाजिक प्रवर्ग, तसेच घराची मालकी स्थितीची नोंद होणार असल्याचे प्रशासनाच्या एका अधिकार्यांनी सांगितले.






