फोटो सौजन्य - Social Media
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी जिल्हा परिषद आणि शासनाच्या शाळांबाबत महत्त्वपूर्ण संदेश देत पालकांना आपल्या मुलांचा प्रवेश शासकीय शाळांमध्ये करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी आणि या शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी शिक्षणाधिकाऱ्यास बेड्या; बनावट शालार्थ आयडीप्रकरणी SIT कडून कारवाई
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, आजची जुनी पिढी जिल्हा परिषद आणि शासनाच्या शाळांमध्ये शिकून मोठी झाली. मात्र, सध्या या शाळा अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे या शाळा टिकवणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असून पालकांनी आपल्या मुलांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश द्यावा, असे त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले.
यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील शासकीय शाळांनी समाज घडवण्यात दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला. शासनाच्या शाळा सक्षम राहिल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी अधिक प्रभावीपणे उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना इंदुरीकर महाराजांनी स्वर्गीय अजित पवार यांचे कार्यही स्मरले. अभ्यासू, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख करत त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुकही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष श्याम जाधव, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, सदाशिव मुंडे, वैभव मीनासे, नगरसेवक उमेश खरात, कैलास मस्के, अजीम शेख, आवेज खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शेख यासीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.






