फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात घडलेल्या एका आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. करडी येथील ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (वय ३९) या तरुणाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली असून समाजमन सुन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सपकाळ हे गुरुवारी संध्याकाळी धाड येथील भाग क्रमांक १, गट क्रमांक ५७ मधील त्यांच्या शेतात गेले होते. शेतात गेल्यानंतर त्यांनी एका झाडाला नायलॉनच्या दोरीने फास तयार केला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईला फोन केला. फोनवर बोलताना त्यांनी “आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे,” असे सांगितले. मुलाचे हे शब्द ऐकताच आई घाबरली आणि तिच्या मनात भीती निर्माण झाली.
आईने तात्काळ आपल्या दुसऱ्या मुलाला घेऊन शेताकडे धाव घेतली. त्या दोघांनी घाईघाईने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान ज्ञानेश्वर यांचा फोन सुरूच होता. काही क्षणातच आई आणि भाऊ शेतात पोहोचले. मात्र त्यांच्या समोरच ज्ञानेश्वर यांनी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत उडी घेतली. आई आणि भावाच्या डोळ्यांसमोरच ज्ञानेश्वर तडफडत असल्याचे दृश्य पाहून दोघेही हादरले. मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईने हे हृदयद्रावक दृश्य पाहताच मोठ्याने हंबरडा फोडला. तिच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर सुन्न झाला. आईचा आक्रोश ऐकून शेजारील शेतकरीही तात्काळ घटनास्थळी धावून आले.
घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत ज्ञानेश्वर सपकाळ यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः आईची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्येही मोठी शोककळा पसरली आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
या प्रकरणी रघुनाथ पांडुरंग सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण करत आहेत. दरम्यान, धाड परिसरात झालेल्या या घटनेमुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. अनेकदा काही अपरिहार्य कारणांमुळे व्यक्ती टोकाचे पाऊल उचलतात. काहीजण गळफास घेऊन किंवा विष प्राशन करून जीवन संपवतात. मात्र अशा आत्मघातकी निर्णयामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि त्याचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे अशा प्रसंगी मानसिक आधार आणि संवादाची गरज अधिक असल्याचेही जाणकारांकडून सांगितले जात आहे.






