फोटो सौजन्य: Gemini
केंद्र सरकारने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी Rahuri ते Shani Shingnapur या 21.84 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात Central Railway चे मुख्य प्रशासनिक अधिकारी अवनीशकुमार पांडे यांनी गुरुवारी (दि. 5) अधिसूचना प्रसिद्ध केली.
या अधिसूचनेनुसार नेवासा तालुक्यातील सोनई आणि शनिशिंगणापूर परिसरातील सुमारे 43.469 हेक्टर (हे.आर) शेतीजमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
सोनाई परिसरातील शेतकऱ्यांची नावे, गट क्रमांक आणि संपादन क्षेत्रासह अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरात चलबिचल आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील बहुतांश जमीन बागायती असल्याने भूसंपादनामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली उपजीविका धोक्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.
सोनई परिसर हा बागायती पट्टा असून येथे मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. त्यामुळे या भागातून रेल्वेमार्ग नेण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. अनेक शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भूसंपादनाच्या वेळी मिळणारा सरकारी मोबदला सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी असतो. त्यामुळे बागायती जमीन जाणे म्हणजे त्यांच्यासाठी मोठा आर्थिक फटका ठरणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग बागायती क्षेत्राऐवजी जिरायती भागातून नेण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
रेल्वे मंत्रालयाने सुरुवातीला खडांबे, कात्रड, मोरेचिंचोरा आणि राऊतवस्ती मार्गे सोनई–शनिशिंगणापूर असा सुमारे 18 किलोमीटर रेल्वेमार्गाचा पर्याय तपासला होता. या भागातील जमीन खडकाळ आणि मुरमाची असल्याने रेल्वेचे फाउंडेशन मजबूत होऊ शकते, असेही सांगितले जात होते. तसेच जवळील घोडेगाव एमआयडीसीमधील उद्योगांनाही या मार्गाचा फायदा होऊ शकला असता. मात्र हा पर्याय पुढे रद्द करण्यात आला.
ऑक्टोबर 2023 मध्ये प्रस्तावित राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाचे जमिनीवरून आणि हवाई सर्वेक्षण करण्यात आले होते. प्रस्तावित मार्ग तांदूळवाडी, देसवंडी, कोंढवड, तमनर आखाडा, उंबरे, ब्राह्मणी, बेल्हेकरवाडी, श्रीरामवाडी, सोनई, लांडेवाडी रोड, गणेशवाडी रोड, खरवंडी रस्ता आणि कांगोणी रस्ता या भागांतून जाणार असून शनिशिंगणापूर येथे रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे.
सोनई परिसरातील शेतकऱ्यांनी या रेल्वेमार्गाला विरोध दर्शवला असून 30 दिवसांच्या आत प्रांताधिकाऱ्यांकडे हरकती नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी अनिल बाबासाहेब निमसे (श्रीरामवाडी, सोनई) म्हणाले, “धार्मिक पर्यटन वाढावे याला आमचा विरोध नाही. मात्र त्यासाठी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी जाणे योग्य नाही. अनेक पिढ्यांची उपजीविका या जमिनीवर अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही या प्रकल्पाविरोधात हरकती नोंदवणार आहोत.”
तर संदीप दरंदले (सोनई) यांनी सांगितले की, “सोनई परिसर हा बागायती पट्टा आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग जिरायती भागातून नेण्याचा विचार सरकारने करावा. आम्हाला रेल्वे प्रकल्पाला विरोध नाही; मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.”






