छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा (Photo Credit- X)
मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी १५ जुलै रोजी झालेल्या छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,
खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड उपस्थित होते. तर इमाव व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहरातील शेवटच्या नागरिकापर्यंत नियमित व शुद्ध पाणी पोहोचविणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाने परस्पर समन्वयातून काम करत योजना वेळेत पूर्ण करावी.
छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व नियमित पाणी पोहोचविण्याचा संकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आढावा बैठक पार पडली. छत्रपती संभाजीनगरवासीयांना पुरेपूर पाण्याचा… pic.twitter.com/7tRMuWzRvB — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 15, 2026
कामातील कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योजनेअंतर्गत अपूर्ण राहिलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. जलकुंभांचे बांधकाम, शहरातील पाणी वितरण यंत्रणेचे काम आणि इतर प्रलंबित कामे पूर्ण न झाल्याने शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याची नोंद त्यांनी घेतली. संबंधित विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कंत्राटदारासोबत स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष अनिल मकरिये, अपर मुख्य सचिव (नगर विकास) के. गोविंदराज, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नायक, महापालिका आयुक्त अमोल येडगे, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जी. श्रीकांत आदी उपस्थित होते.
योजनेची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. उर्वरित कामांचा टप्पानिहाय कृती आराखडा तयार करून पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे हायड्रोलिक टेस्टिंग कंत्राटदारामार्फत पूर्ण करून संपूर्ण यंत्रणा कार्यक्षम असल्याची खात्री करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. नळजोडण्यांचे प्रमाण वाढविण्यासह कंत्राटदाराच्या कामाचे नियमित मूल्यांकन करून आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.
जुन्या पाणीपुरवठा वितरण यंत्रणेव्या कामामुळे खोदलेले रस्ते आणि खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने रिस्टोरेशनची कामे गतीने पूर्ण करून पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, जेणेकरून नागरिकांना त्याचा नाहक आस होणार नाही.






