४३ अंश तापमानात शाळा तपासणीचे फर्मान! छत्रपती संभाजीनगरमधील शिक्षक आक्रमक
तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा तब्येतीचा प्रश्न ऐरणीवर आहे. एवढ्या प्रचंड येलो अलर्ट रेड अलर्ट असलेल्या ४३ अंश तापमान असताना त्यांना फिरायला लावणे चुकीचे असल्याचे शिक्षक भारती संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेने रविवार, १७ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांची भेट घेत निवेदन दिले. शाळा तपासणी मोहिमेला आमचा विरोध नाही परंतु सध्या सर्व शिक्षक हे जनगणना, बीएलओ यासारख्या राष्ट्रीय कामात गुंतलेले असल्याने आता सुट्टीच्या काळात शाळा तपासणी करणे योग्य होणार नाही. ही तपासणी शाळा सुरू झाल्यानंतर १५ जूननंतर करण्यात यावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.
दर्म्य, याबाबत सीईओ यांच्याशी सोमवारी चर्चा करणार असून सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन अध्यक्षांनी दिले असल्याचे संघटनेने म्हटले आहे. आज सोमवारी (१८) याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, झेडपी शिक्षण सभापती, सीईओ, शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन शिक्षकाची बाजू मांडणार असल्याचे शिक्षक भारती संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, जनगणना, एसआयआर मोहीम, केंद्र व राज्य सरकार यांनी इंधनाची बचत करणे, वर्क फॉम्होम करणे, अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय हितासाठी आवाहन केलेले
असतांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाच्या आवाहनाला बगल देऊन सरसकट शाळा तपासणीचे पत्र काढून राष्ट्रीय कार्यात बाधा निर्माण करण्यात येत आहे. अत्यंत खेदजनक बाब आहे. म्हणून आदर्श शिक्षक समितीच्या वतीने आज सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री, राज्य निवडणूक आयोग, प्रधान सचिव, जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबूलाल राठोड यांनी दिली आहे.
जिप शिक्षण विभागाकडून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुख्याध्यापकांनी विविध प्रलंबित कामे पूर्ण करावीत असे सांगितले जात असतानाच १८ मेपासून शाळा तपासणी सुरू करण्यात येईल असेही सांगितले जात आहे. प्रशासनाला नेमकं करायचं तरी काय आहे? शिक्षकांना काम करायला द्यायचं आहे की फक्त आदेशावर आदेश काढायचे आहेत? असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उपस्थित केला आहे. एकीकडे शिक्षकांवर जनगणना व एसआयआर सारख्या राष्ट्रीय जबाबदाऱ्यांचा प्रचंड ताण असताना दुसरीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीतील कामाचे आदेश आणि त्याच काळात भर उन्हात तपासणीचे फर्मान असल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. तापमान ४३ अंशांच्या पुढे, शाळा बंद, विद्यार्थी घरी, आणि प्रशासन मात्र तपासणीच्या नावाखाली कागदपत्रांची मोहीम राबवण्यात व्यस्त आहे. ही संपूर्ण प्रक्रिया १५ जूननंतर राबवा असे परिषदेने म्हटले आहे. हे वेळापत्रक रद्द करण्यासाठी आज सीईओ व शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन शिक्षक संघ शिक्षकांची बाजू मांडणार असल्याचे राजेश हिवाळे यांनी म्हटले आहे.






