पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला (Photo Credit- X)
शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी देण्याचे आदेश न्यायालयाने १२ जूनपासून लागू करण्यास सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात आठवडाभर उशिराने पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे सुरुवातीपासूनच या योजनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच नक्षत्रवाडी येथील नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या स्लॅबला गळती लागली. ही बाब समोर आल्यानंतर २४ जूनपासून नाथसागर येथील पंप बंद करण्यात आले.
कंत्राटदाराने गळतीची दुरुस्ती पूर्ण करून पंप पुन्हा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कळविले. गळतीची दुरुस्ती झाल्यानंतरही पंप सुरू होऊ शकले नाहीत. खराब झालेले व्हॉल्व्ह बदलल्याशिवाय पंप सुरू करणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली. नवीन व्हॉल्व्ह उपलब्ध होण्यासाठी वेळ लागणार असल्याने कंत्राटदाराने कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची लेखी हमी दिली.
तरीही पंप सुरू करण्याबाबत निर्णय होत नसल्याने वाद अधिकच चिघळला. स्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी थेट हस्तक्षेप केला. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेऊन दोन्ही बाजूंना स्पष्ट सूचना दिल्यानंतर अखेर पंप सुरू करण्यात आले. मात्र या सर्व प्रक्रियेमुळे वाढीव पाणीपुरवठ्याला पुन्हा विलंब झाला. नव्या योजनेतून शहराला नियमित आणि वाढीव पाणी मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र कामातील तांत्रिक अडचणी आणि संबंधित यंत्रणांमधील विसंवादामुळे ही अपेक्षा वारंवार भंगत आहे. परिणामी शहरवासीयांमध्ये नाराजी वाढत असून, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पाणी योजनेतील अडथळे दूर करून संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्चस्तरीय बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी २.३० वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह संबंधित विभागांकडून सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.






