टोपलीभर लिंबू ते रेड्यांची शिंग, मुख्यमंत्र्यांचं निवस्थान 'वर्षा' पाडणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
“मला असं वाटतं की अलिकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहतो होतो की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? असं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी-मोठी कामे सुरु होती. दरम्यानच्या काळातच माझी मुलगी १० वीत आहे. १७ तारखेपासून तीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिकडे शिफ्ट होऊ, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरून सुरू झालेल्या राजकारणावर पडदा टाकला. ते एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलत होते.
फडणीस पुढे म्हणाले की, या सर्व कारणांमुळे मी वर्षा निवासस्थानावर सध्या शिफ्ट झालो नाही. मुलीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षा निवासस्थानावर शिप्ट होणार आहे. मात्र, सध्या एवढ्या वेढ्यासारख्या चर्चा सुरु आहेत. मला तर वाटतं की माझ्या सारख्या माणसांने यावर उत्तरही देऊ नये”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला हा सध्या चर्चेत मुद्दा बनला आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून दोन झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी देखील देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर रहायला गेले नाहीत. यामुळे तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. खासदार संजय राऊत यांनी वर्षावर जादूटोणा झाला आहे, रेड्याची शिंगं पुरली आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी जात नाहीत असा खळबळजनक दावा खासदार राऊत यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, “आम्ही गेले अडीच वर्ष तीन पक्षाचं सरकार चालवलं. आताही तीन पक्षाचं सरकार चालवत आहोत. अनेक महत्वाचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की प्रशासनामध्ये त्या काही अडचणी येतात. प्रशासनासाठी आमची लाईन फार स्पष्ट आहे. कारण आमचं धोरणावर फार दुमत नाही, म्हणजे मला एक धोरण हवं आहे आणि मग शिवसेना, राष्ट्रवादीला दुसरं धोरण हवं असं काही नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“आमचं वेगवेगळ्या विषयांवर दुमत असू शकतं, एखाद्या व्यक्तीबाबत दुमत असू शकतं, पण धोरणावर नाही. त्यामुळे धोरणाची एक दिशा सर्व विभागांना दिलेली आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक विभागाला दिला आहे. तसेच प्रत्येक विभागाचं आम्ही सादरीकरण घेणार आहोत. त्यांना त्याचे टार्गेट देखील दिलेले आहेत आणि ते विभाग टार्गेट पूर्ण करण्याचं काम करत आहेत. आमच्या सरकारमधील काही मंत्री देखील त्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यात कुठेही अडचण नाही. त्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की १०० टक्के टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. आम्ही १०० दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे, त्याबाबत १५ एप्रिलपर्यंत काय करायचं? काय टार्गेट पूर्ण केलं याचा एक रिपोर्ट आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत”, अशी माहिती त्यांनी दिली.