‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आयोजित बहुजन कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप संविधानाची पायमल्ली करत ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना त्यांनी “भाजपचा खरा अजेंडा ‘वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी’ असून देशात एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा गंभीर आरोप केला.
सपकाळ म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, समता, सत्यशोधन आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांसह सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा राज्यभर प्रचार करण्यासाठी काँग्रेस वर्षभर जनजागृती अभियान राबवणार आहे.
गावागावांत व्याख्याने, परिसंवाद, विद्यार्थी मेळावे आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचा प्रचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या अधिकारांवर संकट निर्माण झाल्याचा आरोप केला. शेतकरी, बेरोजगारी आणि महागाईसारख्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस कार्यसमिती सदस्य चंद्रकांत हंडोरे यांनी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर टीका करत समतावादी विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले.
माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील बोगस बियाणे, पेपरफुटी, बोगस पदव्या आणि नोकरी घोटाळ्यांवर सरकारवर टीका केली. बोगस बियाण्यांचे रॅकेट सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच अभिनेता आमिर खान यांच्याविषयी भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, हिंदुत्वाचे स्वयंघोषित ठेकेदारांनी इतरांना सल्ले देण्यापूर्वी राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रश्नांवर उत्तर द्यावे, असेही सपकाळ म्हणाले.