सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आज गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे आणि सोबतच या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्यांचं काय करायचं ते बघून असं म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेवरुन काँग्रेस पक्षही आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
सपकाळ म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारा आहे, हे गृहविभागाचे अपयश असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत, त्याचाच हा प्रकार असून आतातरी देवेंद्र फडणवीस यांनी जनाची नाही तर मनाची बाळगून प्रायश्चित म्हणून तरी गृह मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री राज्याला द्यावा, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, गृहविभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणातील निघृणता, स्वारगेट एसटी स्टँडवरील बलात्कार, केंद्रीय मत्र्यांच्या घरातील मुलींना छेडछाड, बदलापूरातील शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार, अशोक खरात प्रकरण, महिला व मुलींचे बेपत्ता होणारे प्रकार…ड्रग्जच्या खुलेआम काळ्याधंद्याने उडता महाराष्ट्र झाला आहे, तरुण पिढीला व्यसनाच्या खाईत ढकलले जात असताना गृहमंत्री म्हणून काहीतरी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे पण फक्त घोषणा होतात कारवाई मात्र काहीच होत नाही. राज्यातील महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोजवारा याला थेट गृहमंत्रीच जबाबदार आहेत, असा हल्लाबोल करत भाजपा महायुती सरकारचा भ्रष्टाचार सुस्साट असून जनता व प्रशासन यांच्यात मिसिंगलिंक आहे, कायदा व सुव्यवस्थेमध्ये मिसिंग लिंक आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.
देशभर जनगणना सुरु झाली असली तरी जातनिहाय जनगणना मात्र होत नाही. जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा पंतप्रधांनी केली होती पण ती आता करत नाहीत कारण हा व्यक्ती फक्त फेकूच नाही तर अत्यंत खोटारडा आहे. मुंह में राम और बगल में नथुराम, असे त्यांचे काम आहे. मोदी यांचा आचार, विचार व व्यवहार हे अगदी उलटे आहे. नथुराम गोडसे महात्मा गांधींच्या पाया पडला व नंतर त्यांचा खून केला, मोदी संसदेच्या पाया पडले व त्यांनी संविधान व लोकशाहीचा गळा घोटला. १०० स्मार्ट सिटी, दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न, रुपयाची घसरण थोपवणे यातील काहीच त्यांनी केलेले नाही. आता जनगणनेसाठी आधार कार्ड मागत आहेत, ते लिंक करणार आहेत, आधारशी सर्व लिंक केलेले आहे, पण मतदार यादीशी ते लिंक करत नाहीत, असेही सपकाळ म्हणाले.
हे सुद्धा वाचा : सेल्फीचा मोह जीवावर बेतला! मावळमध्ये एका दिवसात 4 तरुणांचा बुडून मृत्यू






