संग्रहित फोटो
वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. १) दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घालत जाधववाडी धरणात सेल्फी घेण्याच्या नादात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. याच दिवशी पवना नदी येथेही एका तरुणाचा जीव गेल्याने मावळमध्ये एकाच दिवसात चार जणांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरणावर ही दुर्घटना घडली आहे. धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याची खोली न समजल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी मृत तरुणांची नावे असून ते तिघेही पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातील रहिवासी होते. भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करणारे हे तरुण मूळचे परभणी जिल्ह्यातील होते. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मावळमध्ये फिरण्यासाठी आले असताना ही दुर्घटना घडली आहे.
दुपारी सुमारे तीनच्या सुमारास हे सर्वजण धरण परिसरात पोहोचले. सुरुवातीला वातावरण आनंदी असताना त्यांनी पाण्यात उतरून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो घेत असताना अचानक एक तरुण खोल खड्ड्यात घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोघेही पाण्याच्या ओढीत अडकले आणि काही क्षणातच तिघेही बुडाले. घटनेनंतर इतर मित्रांनी आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. मावळ वन्यजीव रक्षक आणि शिवदुर्ग संस्थेच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून दीर्घकाळ शोधमोहीम राबवली. अखेर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
घटनेमुळे परिसरात हळहळ
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, NDRF आणि तळेगाव दाभाडे अग्निशामक दल यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर तिघांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिघांनाही तपासून मृत घोषित केलं. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटकांनी धरण परिसरात पोहताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे MIDC पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
दरम्यान, मावळ तालुक्यातील सालुंब्रे-गहुंजे येथील जुन्या दगडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ गाव उत्तर प्रदेश) असं मृत तरुणाचे नाव असून, तो साळुंब्रे येथील काळोखे पाईप लाईन कंपनीत काम करत होता. तो पवना नदीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तत्काळ शोध आणि बचावकार्य राबवत मृतदेह बाहेर काढला. यानंतर शिरगाव-परंदवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह पवना हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.






