बीड प्रकरणात कारवाई होणार; धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचं मोठं विधान
बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि वाल्मिक कराडवरील खंडणीच्या आरोपांवरून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची टांकती तलवार आहे. बीडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवरून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षनेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. त्यावर आज अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का? याबद्दल माध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केलं आहे. या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी सुरु आहे. तीन एजन्सी चौकशी करत आहेत. जो कोणी दोषी असेल. ते सिद्ध झालं तर कारवाई निश्चित होणार आहे. चौकशी सुरु आहे. आरोपी सापडायला वेळ लागला. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे, असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला.
कोणत्याही चौकशीमध्ये उद्या कदाचित तुमच्यावरही आरोप होतील. त्यामुळे आता एसआटी, सीआयडी, न्यायाधीशांची चौकशी सुरु आहे. त्याच्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. .या प्रकरणता जो कोणी दोषी असेल तो तिथं सिद्ध झालं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात मी देखील देवेंद्र फडणवीसांना भेटून सांगितलं आहे.
या संदर्भात पक्ष न बघता वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असतील तर कुणाचीही गय करणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले मीही त्याच मताचा आहे. प्रत्येकाची चौकशी करून कुणाकुणाला फोन झाले, किती वेळ बोलणं झालं, हे सगळं समोर येणार आहे. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. सरकारने यात गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे. कुणाला काय बोलायचं याचा अधिकार संविधानाने दिला आहे. असं करताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल.
माझी कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यांना (सुरेश धस) मी सांगितलं आहे, नुसते आरोप करण्यापेक्षा तपास यंत्रणेला पुरावे द्या. त्याबद्दल माझी आणि बावनकुळेंशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे बीड प्रकरणाचा बारकाईने तपास सुरु आहे. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच आम्हाला काळजी आहे. आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे आमची जबाबदारी जास्त आहे. याच्यात आम्ही कुणालाही पाठिशी घालणार नाही.
वाल्मिक कराडशीसंबंध असल्याच्या कारणावरून धनंजय मुंडे काही दिवसांपासून निशाण्यावर आले आहेत. या दरम्यान याच वातावरणात त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे ते राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आज अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली.