शिरूर तालुक्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; मध्यरात्री कुटुंबिय झोपेत असताना बिबट्या आला अन्...
कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (वय ५ वर्षे) मूळ करोडी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथील असून, सध्या पिंपळसुटी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वास्तव्यास होती. तिचे काका बाबासाहेब कोंडीबा वारे (वय ३६) यांनी याबाबत खबर दिली आहे. २२ जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास, पिंपळसुटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या गोठ्यात कुटुंबीय झोपलेले असताना अचानक आवाज आल्याने बाबासाहेब वारे जागे झाले. त्यावेळी त्यांनी बिबट्याने चिमुकली भाग्यश्रीला उचलून नेत असल्याचे पाहिले.
कुटुंबीयांनी मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, बिबट्या तिला जवळील ऊसाच्या शेतात घेऊन गेला. या घटनेची माहिती तात्काळ शेतमालक, वन विभाग आणि ग्रामस्थांना देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर भाग्यश्री गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, न्हावरे येथे नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेमुळे पिंपळसुटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
लांजा तालुक्यातही बिबट्याचा हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, रात्रीच्यावेळी घरात टीव्ही पाहत बसलेल्या माणसांवर घरात घूसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. रात्री नऊच्या दरम्यान लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक कुसुमलेवाडी येथे घडली आहे. घरातील माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारील जंगलात पसार झाला. बिबट्याने केलेले हल्ल्यातील जखमी संतोष गोविंद सुर्वे (वय ५०) व हर्षद राजेंद्र सुर्वे (वय १९, दोघेही राहणार बेनी बुद्रुक कुसुमलेवाडी) यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करण्यात आले. मात्र, संतोष सुर्वे यांच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.






