कोल्हापूर : मणिपूरसहित (Manipur Violence) देशातील इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करणारे मोकाट सुटले आहेत. असे असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रायश्चित म्हणून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आजपासून पुढील 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरु केले. इचलकरंजी येथे या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाला. मुसळधार पाऊस पडत असतानाही त्यांच्या आंदोलनाला नागरिकांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला.
मणिपूरमध्ये मानवी क्रौयाची परिसीमा झाली आहे. जवानाच्या पत्नीवरही अत्याचार झाल्याची चित्रफित पुढे आल्याने संतापाची लाट उसळली आहे. हा संदर्भ देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीन दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळी अकरा वाजता राजू शेट्टी यांनी ७२ तास अन्नत्याग सत्याग्रहास प्रारंभ केला. पहिल्या दिवशी त्यांच्यासोबत महंमद हुसेन मुजावर, विश्वास बालिघाटे, पुरंदर पाटील, राजू निर्मळे आदी चक्री उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.