सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या ग्रीन लाइनवरील मुलुंड मधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनने भाजपाच्या विकासाची पोलखोल केली आहे. मुलुंडच्या घटनेत एकाचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरु असून, स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात सुरु असून तो आता लोकांच्या जिवावर उठला आहे, हे मुलुंडच्या घटनेने पुन्हा दाखवून दिले आहे. मेट्रोची कामं लोकवस्तीच्या ठिकाणी होत असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? कामाचा दर्जा आणि सुरक्षेकडे सरकार बघणार आहे की नाही? हा प्रश्न असून फक्त कंत्राटदारावर कारवाई करुन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करु नये. जसे श्रेय घेता तशी जबाबदारीही घेण्यास भाजपा महायुती सरकारने शिकले पाहिजे. असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
कोस्टल रोड, मुंबई ट्रांस हार्बर लिंक रोड, समृद्धी महामार्ग या मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे बांधकाम किती तकलादू आहेत हे एका वर्षातच या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लाखो कोटी रुपये खर्च करून जर हे प्रकल्प जनतेसाठी जीवघेणे ठरत असतील तर असा विकास काय कामाचा? मुलुंडमध्ये मेट्रो कामाचे स्लॅब कोसळण्याच्या घटनेची सरकारने गांभिर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करावी, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.






