इराण इस्रायल युद्धाचा हळदीच्या किमतीवर आणि विक्रीवर परिणाम होत आहे (फोटो - सोशल मीडिया)
Hingoli News : हिंगोली : आखाती देशामध्ये युद्ध सुरु असल्याने भारतीय बाजारपेठांवर याचा परिणाम होत आहे. एकीकडे एलपीजी गॅसचा तुटवडा भासत असताना फळ आणि भाज्यांवर देखील युद्धाचा (Iran-Israel War) परिणाम होत आहे. घरगुती एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. तर व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीवर विपरित परिणाम झाला आहे. यानंतर आता हिंगोलमध्ये (Hingoli News) हळद उत्पादन आणि विक्रीवर देखील युद्धाचे सावट आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मराठवाडा आणि विदभांतील हळद खरेदी-विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळदीची आवक सुरू झाली असली तरी भाववाढीवर आखाती देशांतील युद्धाचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या हळदीचे दर घसरले असून युद्धस्थिती कायम राहिल्यास भाव आणखी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मार्केट यार्डात दरवर्षी हंगामात सुमारे ५ ते ७ हजार क्विंटल हळदीची आवक होते. हंगामाच्या प्रारंभी सध्या दररोज एक ते दीड हजार क्विंटल हळद विक्रीसाठी दाखल होत आहे.
हे देखील वाचा : विरोधकांनी संसदेत मांडली चूल! गॅस तुटवड्यावरुन सरकारवर आगपाखड
हळदीला मिळतोय १३ हजार ५०० रूपयांचा दर
यात नवीन हळदीसोबत काही प्रमाणात जुन्या हळदीचाही समावेश आहे. सध्या हळदीला सरासरी १३,५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत असून गेल्या वर्षाच्या तुलनेत हा दर कमी असल्याने शेतक-यांची निराशा होत आहे. हळदीच्या दरघसरणीमागे केवळ स्थानिक कारणे नसून आंतरराष्ट्रीय घडामोडीचाही मोठा परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्याचे मत आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात घटण्याची शक्यता असल्याने खरेदीदार सध्या सावध आहेत. युद्धविराम न झाल्यास आंतरराष्ट्रीय वाहतूक व मागणीवर परिणाम होऊन हळदीचे दर आणखी घसरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.
हे देखील वाचा : “नमो नमो अन् जय श्रीराम म्हणा, गॅस आपल्या दारात; LPG गॅस तुटवड्यावरुन विरोधकांची बोचरी टीका
बाजारात केळीचे दर दुप्पटी, तिपटीने घसरले
युद्धापूर्वी १९०० रुपये प्रतिक्विंटल असलेले केळीचे दर ६०० ते ८०० रुपयांवर आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. निर्यात घटल्याने नुकसान वाढत असल्याची तक्रार आहे. तसेच सोयाबीन, तूर व हरभरा या पिकांच्या दरातही ५०० ते १००० रुपयांची घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी व प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात गॅस साठा उपलब्ध; रुग्णालयांना प्राधान्यः जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
जिल्ह्यात एकूण १३ गॅस एजन्सी असून ३ लाख ७४ हजार ४७८ ग्राहकांना सेवा दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे. जिल्ह्यात व्यावसायिक गैस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णालये, वसतिगृहे तसेच शासकीय संस्थांना प्राधान्याने पुरवठा करण्यात येत आहे. तसेच घरगुती वापरासाठी ४ हजार ४३५ गैस सिलेंडर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. गॅस प्लांटमध्ये घरगुती सिलेंडरचा सुमारे ३ दिवसांचा बफर साठा असून वितरकांकडे दीड दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस साठवणूक करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






