कणकवली : कणकवलीच्या आमदारांनी मनसेला सल्ला देऊ नये. महामार्गावर अद्यापही वस्तुस्थिती खड्डेमय रस्ते आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटून विमानसेवा सुरू करणार, अशी कामे श्रेयासाठी करु नका. कारण विमान सेवा बंद पडल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काय केले? पालकमंत्र्यांनी रेल्वे स्थानक मार्गासाठी मॅनेज करुन टेंडर काढली, मात्र कोणतीही कामे झालेली नाहीत. ग्रामीण, राज्य आणि महामार्गावर चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.
चाकरमानी मोठ्या उत्साहाने, भक्तीभावाने आले होते. धोकादायक प्रवासातच त्यांचा उत्साह निघून गेला. जाताना प्रवास करताना मोठ्या अडचणी निर्माण होतील या भीतीपोटी ५ दिवसाने परत गणपतीचे विसर्जन चाकरमान्यांनी केले. बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी महामार्ग गणपतीपूर्वी सुरक्षित बनवला जाईल अशी घोषणा करून जनतेची दिशाभूल केली. हा रस्ता सुरळीत करण्याचा आव आणला. पण चाकरमान्यांना येताना प्रवासाला वेळ गेला, रस्ते खड्डेमय आहेत.
टेंडर मॅनेज करुन ४ स्टेशनचे निविदा काढण्यात आली. त्या ठिकाणी पण कोणतेही काम केलं जातं नाही. रेल्वे स्टेशन मार्गावर खड्डे असल्याने त्या खड्ड्यातून चाकरमान्यांना जावे लागले. या जिल्ह्यातील नागरिकांना खड्डे असलेल्या रस्त्याने प्रवास करावा लागला. ज्या नेत्यांनी एसटी मोफत सेवा दिली, मात्र जाताना चाकरमान्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. जाताना प्रवास करताना रस्त्याची दुरावस्था व रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे हाल दिसत आहेत. ते चाकरमान्यांचे हाल पालकमंत्र्यांनी पाहण्याची गरज असल्याचे मत श्री. उपरकर यांनी व्यक्त केले.
कोकणी माणसांसाठी मनसे रस्त्यावर उतरून काम करत राहणार आहे. कणकवलीच्या आमदाराने पहिल्यांदा कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील आरोग्य सेवा कोलमडली आहे, त्याबाबत केंद्रीय आरोग्य मत्र्यांशी ना.राणेंना बोलायला सांगावे. जनतेला पहिल्यांदा चांगली आरोग्य सेवा द्यावी. आरोग्य व्यवस्था काय आहे? हे पहिल्यांदा आमदारांनी पहावे, असा टोला श्री. उपरकर यांनी लगावला.
कणकवलीचे आमदार मनसेला सल्ला देत आहेत, मनसेने किती सबुरी घ्यावी? तुम्ही खोटी आश्वासने दिली आहेत त्याचे काय? आज हायवे बाबत उच्च न्यायालयात २१ डिसेंबरला रस्ता पूर्ण करु असे सांगितले. त्याला अडीज वर्षे झाली आहेत, तरी रस्ता सत्ताधारी पूर्ण करू शकले नाहीत. चीपी विमानतळावर विमान सेवेबाबत नारायण राणे हे केद्रीय मंत्री असूनही सेवा ठप्प आहे, हे अपयश आहे. आता आमदार सांगत आहेत की, ना.राणे केंद्रीय विमान उड्डाण मंत्र्यांशी बोलून प्रश्न मार्गी लावणार, हे चुकीचे आहे. ज्यावेळी विमानतळ सुरु झाले त्यावेळी श्रेयाची लढाई लागली होती. आता इतके काळ विमानतळ बंद आहे, त्याबाबत राणेंना बोलू नये असे सांगितले होते का? श्रेयासाठी करत असाल तर जनतेला नको. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला शाश्वत विकासाची हमी असावी, असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.