जखमींना उपचारासाठी कोल्हापूरला हलवले
मानवी वस्तीजवळ असलेल्या उखुळ येथील मुख्य रस्तावर मानवी वस्ती लगत अचानक चांदोली अभयारण्यातून आलेल्या गव्याने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत संजय वडाम रस्त्याच्या कडेला फेकले गेले, त्यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. सोबत असलेली दोन्ही मुलेही या अपघातात जखमी झाली. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमींना खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, शितूर येथे दाखल केले.तेथे संजय वडाम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले, तर दोन्ही मुलांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
महिनाभरात सातवी घटना; वनविभाग सुस्त
गेल्या महिन्याभरात या परिसरात गव्याने हल्ला करण्याची किंवा धडक देण्याची ही सहावी ते सातवी घटना आहे.
गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या घटना घडूनही वनविभागाचे अधिकारी याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत.
जखमींना वेळेवर मदत मिळणे तर लांबच, पण माहिती देऊनही वनविभागाची गाडी वेळेवर उपलब्ध झाली नाही.
आमची गाडी जंगलात गेली आहे, आल्यावर पाठवतो, असे बेजबाबदार उत्तर वनविभागाकडून मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रशासकीय दिरंगाई व भौगोलिक अडचण
उखुळ गावाची वन्यजीव विभागाची कार्यालयीन व्यवस्था ही 40 किमी अंतरावर असलेल्या आंबा येथून चालते.भौगोलिक परिस्थिती पाहता, उखुळ हे वारणावती येथील वन्यजीव कार्यालयापासून अवघ्या 3 किमी अंतरावर आहे.त्यामुळे हे गाव वारणावती कार्यालयाला जोडावे, अशी मागणी वारंवार करूनही वनविभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
आम्ही वारंवार वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत. त्यांना गावात येऊन परिस्थितीची पाहणी करण्याची आणि स्थानिकांच्या समस्या समजून घेण्याची विनंती केली आहे. मात्र, अधिकारी या भागात फिरकायलाही तयार नाहीत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे लोकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
– भाग्यश्री थोटफळ सरपंच, उखुळ
न्यायालयाने आदेश देवूनही ‘जैसे थे’ परिस्थिती
मुंबई हायकोर्टाने गेल्या गुरुवारी काही उपाययोजना सुचवले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी असा आदेश असताना देखील आज अखेर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी केली नाही. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीला आता फक्त अवघे ३ दिवस उरले आहेत. या ३ दिवसात वनविभाग काय निर्णय घेते कि अणखीण काही विपरीत घडते की काय? हे आता काळच ठरव शकते.






