Maharashtra Breaking News Updates Today:
24 Apr 2026 10:24 AM (IST)
भारतातील सर्वच लोकांमध्ये आयपीएल 2026 ची क्रेझ आहे. आयपीएलची हीच क्रेझ लक्षात घेऊन गेमिंग कंपनी क्राफ्टनने लोकप्रिय बॅटल रॉयल गेम बीजीएमआयमध्ये एक नवीन क्रिकेट लीग ईव्हेंट आणला आहे. गेमर्ससाठी अजूनही हा ईव्हेंट लाईव्ह आहे. या गेमिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेपन स्किन, गन अटॅचमेंट आणि आउटफिट रिवॉर्ड स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्लेअर्सना स्पिन टोकन देखील मिळणार आहे. या सर्व रिवॉर्ड्समुळे प्लेअर्सचा गेमिंग अनुभव अधिक चांगला होणार आहे. जर तुम्ही क्रिकेट लव्हर असाल आणि तुम्हाला बीजीएमआय खेळायला आवडत असेल तर हा गेमिंग ईव्हेंट तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. गेमिंग ईव्हेंटबाबत अधिक जाणून घेऊया.
24 Apr 2026 10:14 AM (IST)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
24 Apr 2026 10:04 AM (IST)
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या मटका किंग या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. जी ६० च्या दशकातील एक आकर्षक कथा आहे. या प्रोजेक्टमध्ये ती ‘बरखा’ हे शक्तिशाली भूमिका साकारत आहे. अलिकडेच तिने अमर उजालाल दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या भूमिकेबद्दल, इंडस्ट्रीतील टाइपकास्टिंगबद्दल, अखिल भारतीय ट्रेंड्सबद्दल, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, अभिनयातील बदलत्या काळाबद्दल आणि तिच्या लग्नाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे.
24 Apr 2026 09:50 AM (IST)
एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला हिंदी आवृत्तीतून हा नकाशा वगळल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनांना केराची टोपली दाखवत आता इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातूनही नकाशा हटवण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी विधानमंडळात केलेल्या दाव्यांना एनसीईआरटीने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे यातून स्पष्ट होत असून, मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे राज्य सरकारची केंद्रातील वजनशक्ती आणि भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
24 Apr 2026 09:40 AM (IST)
दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाचा आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अत्यंत शिवराळ भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. "तुला घरात घुसून मारेन आणि जीभ छाटेन" अशा प्रक्षोभक विधानांची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. या धमकीवजा संभाषणात गायकवाड यांनी गोविंद पानसरे यांच्या संदर्भातही आक्षेपार्ह भाष्य केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
24 Apr 2026 09:35 AM (IST)
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादात सापडले आहेत. या शीर्षकाचा आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणावरून आंबी यांनी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली असली, तरी तांत्रिक कारणास्तव पोलिसांनी अद्याप आमदारांवर गुन्हा दाखल केलेला नाही. लोकप्रतिनिधीकडून झालेल्या या अभद्र वर्तणुकीमुळे राज्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
24 Apr 2026 09:15 AM (IST)
बुलढाणा जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबतच पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले असून ग्रामीण व शहरी भागात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पाच मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा केवळ ३० टक्क्यांवर आल्याने प्रशासकीय चिंता वाढली असून मे आणि जूनमध्ये ही स्थिती अधिकच भीषण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने १५ गावांत टँकर सुरू केले असून, ४८ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, खालावलेली पाणीपातळी पाहता आगामी काळ जिल्ह्यासाठी मोठ्या परीक्षेचा ठरणार आहे.
24 Apr 2026 09:07 AM (IST)
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकीय वारे आता १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीकडे वळले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४० आमदारांचे संख्याबळ असल्याने विजयासाठी आवश्यक २८ मतांचा कोटा पाहता त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र, दुसऱ्या जागेसाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असेल. या पार्श्वभूमीवर, पक्षातील एका निश्चित जागेवर वर्णी लागावी यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून, उद्धव ठाकरे लढणार असतील, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, लढणार नसतील, तर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांना समन्वयाने चर्चा करावी लागेल. तसेच राज्यसभेच्या पुढील जागांबाबतही आताच स्पष्टता आवश्यक असल्याचे नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही उद्धव ठाकरे यांनीच ही निवडणूक लढावी, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांचा अनुभव राज्य आणि परिषदेला उपयोगी ठरेल, असे त्या म्हणाल्या.






