विकेंडला पार्टीचा प्लॅन? थांबा! राज्यभरात दारू विक्री बंद; बार, पब आणि वाईन शॉप्स राहणार बंद, काय आहे कारण?
या धार्मिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सणाचे पावित्र्य जपण्यासाठी राज्य सरकारकडून ड्राय डे लागू करण्यात आला आहे. या दिवशी मद्यविक्रीवर पूर्ण बंदी राहणार असून परवानाधारक बार, पब आणि मद्यविक्रीची सर्व आस्थापने बंद ठेवावी लागतील. त्यामुळे विकेंडसाठी बाहेर जाण्याचा किंवा पार्टीचा बेत आखत असाल, तर २५ जुलै रोजी राज्यात मद्यविक्री उपलब्ध नसणार याची नोंद घेऊनच आपले नियोजन करावे.
हिंदू धर्मात आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी किंवा शयनी एकादशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भगवान श्रीविष्णूंना समर्पित असलेली ही एकादशी यंदा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील लाखो भाविक या दिवशी उपवास, पूजा-अर्चा आणि नामस्मरण करतात.
एकादशी तिथी सुरू: २४ जुलै २०२६, सकाळी ९:१२ वाजता
एकादशी तिथी समाप्त: २५ जुलै २०२६, सकाळी ११:३४ वाजता
एकादशी तिथी २५ जुलैच्या सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात असल्याने, याच दिवशी उपवास आणि धार्मिक विधी केले जातील.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवसापासून भगवान श्रीविष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. पुढील चार महिने विवाहासारख्या शुभ कार्यांवर मर्यादा येतात आणि भक्ती, साधना, जप-तप व व्रतांना विशेष महत्त्व दिले जाते.
महाराष्ट्रात आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी हे प्रमुख आकर्षण असते. लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर गाठतात. राज्यभरातील मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ, अभिषेक आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठलाची भक्तिभावाने पूजा करून उपवास केल्यास पुण्यप्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे देशभरातील विष्णुभक्तांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो.
Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चार महिन्यांचा पवित्र काळ; जाणून घ्या प्रमुख सणांची माहिती






