हरित महाराष्ट्रासाठी एसटीचा पुढाकार; १४ जुलैला सर्व आगार, बसस्थानकांवर वृक्षारोपण
या अभियानांतर्गत राज्यातील सर्व विभागीय कार्यालये, आगारे आणि बसस्थानक परिसरात स्थानिक हवामानाला अनुरूप तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी उपलब्ध जागेचा योग्य वापर करून विशेषतः कुंपणालगत वृक्षारोपण करण्याच्या सूचना एसटी महामंडळाने सर्व विभागांना दिल्या आहेत. या राज्यव्यापी उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम मुंबई विभागीय कार्यालय, विद्याविहार येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला असून, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
मोठी बातमी! कोकण अन् पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला? ताम्हिणी घाट बंद अन् ‘लालपरी’ची सेवा ठप्प
महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, वृक्षारोपण केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता त्याचे नियमित संगोपन करण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाची भावना सातत्याने जोपासण्यासाठी प्रत्येक विभागाने लागवड केलेल्या वृक्षांची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानात स्थानिक आमदार, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींना सहभागी करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे. याशिवाय स्थानिक प्रशासनातील अधिकारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी, एसटी कर्मचारी तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येणारा हा राज्यव्यापी वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करणारा ठरेल.” एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ वर्धापन दिनाचा कार्यक्रम नसून, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी राज्यभरात जनजागृती निर्माण करणारा महत्त्वाचा उपक्रम ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान






